मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे बॅनर त्यांचे समर्थक भावी मुख्यमंत्री म्हणून झळकवत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार, असा दावा केल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचे आहे की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी सातार्यात केला. त्यांच्या या दाव्यानंतर अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या तोंडात साखर पडो, अशी प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटलांच्या दाव्याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी भाषण देताना कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे म्हणून केल्याचे सांगितले. असेच दावे आम्हीही करत असतो, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री होण्यासाठी आपण आधी एकत्र बसू, मग सत्ता येईल. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यात मुख्यमंत्री ठरेल, असे राऊत म्हणाले. भाषणात आपण तसे बोलतच असतो.
जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जयंत पाटील यांनी कोणत्या समीकरणाच्या आधारे ही विधान केले आहे ते माहिती नाही. पण ज्याचे जास्त आमदार असतात त्याचाच मुख्यमंत्री होतो. त्यामुळे या विषयावर काही चर्चा करायची नाही.