BMC : मुंबई महापालिकेच्या उपहारगृहातून २५० ताटे, ८ हजार चमचे, ३०० प्लेट गायब
मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिका मुख्यालयात (BMC) असलेल्या प्रशस्त उपहारगृहातील अनेक भांडी गेल्या वर्षभरात गायब झाली आहेत. यात 250 पेक्षा जास्त ताटं असून ७ ते ८ हजारपेक्षा जास्त चमचे व ३०० पेक्षा जास्त नाश्ता प्लेट व कपांचा समावेश आहे. ही भांडी गायब झाल्यामुळे उपहारगृहाचे ६० ते ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पालिका मुख्यालयातील (BMC) उपहारगृहात एका वेळी १०० पेक्षा जास्त कर्मचारी बसतील एवढी जागा आहे. या उपहारगृहामध्ये केवळ पालिकेचे कर्मचारीच येत नाही तर, पालिकेत कामानिमित्त येणारे नागरिक आजाद मैदानात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस खास करून जेवण व नाश्त्यासाठी येतात. तर पालिकेतील अनेक कर्मचारी सकाळ सायंकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण थेट आपल्या विभागात मागवून घेतात. तर काही कर्मचारी स्वतः उपहारगृहात येऊन ताटातून जेवण घेऊन आपल्या विभागात निघून जातात. परंतु ताटांसह अन्य भांडी पुन्हा आणून देत नाहीत. उपहारगृहातील कर्मचारी अनेकदा भांडी परत आणण्यास विसरतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात हजारो भांडी कमी झाल्याचे दिसून आले.
उपहारगृहातील भांड्याची पाहणी केले असता २५० पेक्षा जास्त जेवणाची ताटे गायब असल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर ७ ते ८ हजारांपेक्षा जास्त चमचे, ३०० पेक्षा जास्त नाश्ता डिश, चहाचे कप, ग्लास अन्य भांडी गायब असल्याचे दिसून आले. उपहारगृहातील कर्मचाऱ्यांनी ही भांडी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, भांडी मिळालीच नाही. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कार्यालयांना कॉर्पोरेट लूक देण्याचे काम सुरू असल्यामुळे यात अनेक भांडी भंगारमध्ये गेल्याचे तर काही भांडी चोरीला गेल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे भांडी बाहेर नेता येणार नाही, असे फलकच उपहारगृहाबाहेर लावण्यात आले आहेत.
हेही वाचा