मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. या दोघांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी मला आदेश आला, तर मी नक्की पुढाकार घेईल, असे वक्तव्य राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा संघर्ष पेटला असताना आणि ठाण्यात युवा सेनेच्या कार्यकर्तीवर शिंदे गटाच्या महिला पदाधिकार्यांनी हल्ला केल्याने वातावरण आणखी चिघळले आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा सल्ला एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे. आमदार अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असे भाकीतही त्यांनी केले. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्षफुटीला सामोरे जावे लागले, असा टोलाही त्यांनी लगावला.