प्राप्तिकर विभाग : मंत्रालयात अधिकारी, दलालांचे रॅकेट उघड
आवडत्या मंत्र्याकडे पोस्टींग मिळावी यासाठी तब्बल 200 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मोजणे, शेतकर्यांकडून जमिनी खरेदी करून उद्योजकांना सरकारकडून त्या जमिनींची मंजुरी मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करणे, अशा प्रकारे तब्बल 1050 कोटी रुपयांच्या अधिकारी, दलाल आणि उद्योजकांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश प्राप्तिकर विभाग च्या माध्यमातून करण्यात आला आहे.
गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात विविध ठिकाणी छापेमारी सुरू असून यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या छापेमारीत प्राप्तिकर विभाग मार्फत 25 निवासी तसेच 15 कार्यालयांवर छापे टाकले. तर 4 कार्यालयांवर वॉच ठेवण्यात आला आहे. या कारवाईत विविध प्रकारचे डिजिटल पुरावे तसेच वित्तीय व्यवहाराची महत्वपुर्ण कागदपत्रे हाती लागली असून टप्प्याटप्प्याने याबाबतची आणखी माहिती समोर येणार आहे.
छाप्यात काय मिळाले? ( प्राप्तिकर विभाग )
- अनेक कंत्राटदारांकडून सरकारची थकीत देयके मिळविण्यासाठी कोट्यवधी रुपये.
- या रक्कमेच्या गेल्या 10 वर्षांतील देवाणघेवाणीबाबतचे किंवा ट्रान्झॅक्शनचे पुरावे प्राप्तिकर विभागाच्या हाती.
- सर्व व्यवहार सांकेतिक नावाने किंवा सांकेतिक नोंदींच्या माध्यमातून.
- तारखेसहीत व्यवहारांचे पुरावे
- अनेक कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या छापेमारीत तारखेसहीत व्यवहारांचे पुरावे प्राप्तिकर विभागाच्या हाती.
- अनेक व्यवहार 23 कोटी आणि 40 कोटी रुपयांचे
- अनेक व्यक्तिंशी 23 कोटी रुपयांचे व्यवहार. सर्व व्यवहार सांकेतिक नावाने.
- निविदा तसेच खाणींच्या कंत्राटांची मुदत वाढवून घेण्यासाठीही व्यवहार.
- 12 कोटी रुपयांच्या रोख रक्कमेचे व्यवहार झाल्याचेही व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून उघड.
ओबेरॉय हॉटेलच्या आलिशान खोल्यांमधून व्यवहार ( प्राप्तिकर विभाग )
- दोन दलालांनी ऑबेरॉय हॉटेलमध्ये काही आलिशान खोल्या कायमस्वरुपी भाड्याने घेतल्या आहेत. या खोल्यांमधून हे दलाल आपला कारभार पाहत होते. या दलालांनी केलेल्या व्यवहारांच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले. संबंधित आलिशान खोल्यांमध्ये दलाल, उद्योजक तसेच कॉर्पोरेट संस्था यांच्या बैठका होत होत्या.
- 4.6 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम तसेच 3.42 कोटी रुपयांचे दागिने जप्त . 4 लॉकर्स प्राप्तिकर विभागाच्या हाती.
- दलाल आणि उद्योजक तसेच अधिकार्यांनी शेतकर्यांकडून खरेदी केलेल्या जमिनींच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर कमाई.
- शेतकर्यांकडून खरेदी केलेल्या जमिनींना सरकारी योजनेच्या माध्यमातून मंजुरी मिळवून बड्या कॉर्पोरेट कंपन्यांशी व्यवहार.
- या व्यवहारात अनेक वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक आणि बड्या हस्तींची गुंतवणूक.
हे डिजिटल पुरावे लागले हाती ( प्राप्तिकर विभाग )
डिजिटल डाटा, मोबाईल फोन, पेनड्राईव्ह, हार्ड ड्राईव्ह, आयक्लाऊड, ई-मेल्स इत्यादी डिजिटल पुरावे हाती लागले असून त्यांची पडताळणी सुरू आहे.
आंगडीयाकडून दीड कोटी जप्त ( प्राप्तिकर विभाग )
पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी आंगडीयांचाही वापर करण्यात येत होता. छापेमारीदरम्यान, एका आंगडीयाकडून प्राप्तिकर विभागाने 1.50 कोटी रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली.