

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. राज्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मात्र, पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय या सरकारला आदेश काढावेत, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गारपिटीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत, असे आवाहन अजित पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी केले.
सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी ७५ टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात, असे वक्तव्य केले. अशा पध्दतीने सर्व कर्मचार्यांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार ? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.
काही तालुक्यात पालक आणि नागरिक शाळा चालवत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. आणि सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.
महसुल नियमानुसार आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी. आणि वाटप सुरू करावे. आजच्या आज उपाययोजना करावी. तात्काळ निर्णय करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केली.
हेही वाचा