आदिवासींना वनवासी बोलणे म्हणजे त्यांचा अपमान : शरद पवार | पुढारी

आदिवासींना वनवासी बोलणे म्हणजे त्यांचा अपमान : शरद पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी असून त्यांना ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणे हा एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे. जग, जंगल आणि जंगली याचे ते खरे मालक आहेत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. २०२२ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी असणारे व्यक्तिमत्त्व अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार बोलत होते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रम पार पडला.

यावेळी ते म्हणाले, या आदिवासींच्या हिताची जपणूक करण्यासाठी विशेष लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे. हे ध्यानात घेऊन आज ती जबाबदारी सगळ्या सहका-यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मध्यंतरी वर्धा येथील सेवाग्राममध्ये आदिवासींमध्ये काम करणारे आदिवासी गावाचे गावप्रमुख यांचे एक संमेलन घेतले होते.
शेकडो लोक व भगिनी होत्या. आपल्या गावाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कष्ट करायला कुठलीही कमतरता नाही या गोष्टी पदोपदी त्या सांगत होत्या. आणि त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या पाठीशी ही सगळी शक्ती उभी आहे. त्यांच्या पाठीशी चव्हाणसेंटर उभे राहिल आणि उपेक्षित माणसाला साथ देईल अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी दिली.

शरद पवार यांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडून सांगताना सार्वजनिक जीवनात कसे वर्तन असावे याचे आदर्श यशवंतराव चव्हाण होते, असे सांगितले. ते गेल्यानंतर काही गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्या होत्या. त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी काही लोकांवर टाकली होती. त्यात माझाही थोडा सहभाग होता ही आठवण सांगतानाच दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या.

Back to top button