शेतकऱ्यांना काय मदत देणार ?, तत्काळ जाहीर करा : अजित पवार | पुढारी

शेतकऱ्यांना काय मदत देणार ?, तत्काळ जाहीर करा : अजित पवार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अवकाळीने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे, हे तत्काळ जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि.८) सभागृह सुरू होताच केली.

गेल्या दोन दिवसांत नाशिक, धुळे, बुलढाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यात काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे.

वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

सरकार तातडीने मदत काय करणार, केंद्र सरकारचे पथक कधी येणार आहे असा सवालही अजित पवार यांनी केला. मंगळवारी सरकार रंगाची होळी खेळत होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची होळी होत होती, अशा शब्दांत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल करत नाराजी व्यक्त केली. सरकार तातडीने काय पाऊले उचलणार आहे, हे सांगितले पाहिजे. शेतकरी कर्ज कसे फेडणार आहेत, असा सवालही भुजबळ यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. त्यानंतर झालेल्या नुकसानीची आकडेवारी आणि अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. याबाबत संध्याकाळपर्यंत सरकार म्हणणे मांडेल, असे सांगितले.

हेही वाचा 

Ajit Pawar | कांदा, कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नावर अजित पवार सभागृहात आक्रमक

पुढच्या अधिवेशनाच्याआधी आश्वासन दिलेल्या बैठका लावा: अजित पवार सरकारवर संतापले

अजित पवार हे राष्ट्रद्रोही; चहापानाला आले नाहीत हेच बरे झाले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Back to top button