मुंबई : ५ वर्षांत आश्रमशाळांतील ६५ विद्यार्थ्यांचा मृत्यू | पुढारी

मुंबई : ५ वर्षांत आश्रमशाळांतील ६५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  २०१७ ते २०२२ या पाच वर्षांमध्ये शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमधील ६५ विद्यार्थ्यांचा आजारपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. आश्रमशाळेत असताना, सर्पदंशामुळे ५, विजेचा शॉक २, आजारपण ३५, अपघात ४ व स्वत:चे जीवन संपवणे  ७ असे एकूण ५३ विद्यार्थी मृत्यू पावलेले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचा मृत्यू पालकांच्या ताब्यात असताना झालेले आहेत. आदिवासी विकास, नाशिक अंतर्गत एकूण २१४ शासकीय आश्रमशाळा तसेच २११ अनुदानित आश्रमशाळा आहेत. त्यामुळे नाशिक विभागात विद्यार्थी मृत्यूसंख्या जास्त आहे.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूकारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी सेवानिवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने दिलेल्या अहवालानुसार, यापुढे होणाऱ्या प्रत्येक मृत्यू प्रकरणाची त्वरित दखल घेऊन प्राथमिक चौकशी करणे, विद्यार्थी मृत्यूचे वैद्यकीय सामाजिक दृष्टीने विश्लेषण करणे, प्रत्येक प्रशासकीय स्तरावर त्वरित कार्यवाही होते किंवा कसे याबाबत त्रैमासिक आढावा घेण्याच्या अनुषंगाने प्रकल्प स्तरावर आपत्कालीन आढावा गट, वैद्यकीय सामाजिक आढावा समिती तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही डॉ. गावित यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील पेठ येथील एकलव्य निवासी शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन  दिले जात असल्याचे उघडकीस आले आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेच्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून नाशिक, राजूर व जव्हार या प्रकल्पातील ३७ शासकीय आश्रमशाळा व ५ एकलव्य निवासी शाळांतील विद्यार्थ्यांना भोजन व अल्पोपाहार पुरविण्यात येतो.

विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल या शाळेतदेखील मुगडाळीच्या वरणामध्ये ६ जानेवारी २०२३ रोजी १ विद्यार्थ्यास अळी दिसल्याचे त्याने प्राचार्यांच्या निदर्शनास आणले होते. या घटनेची माहिती मिळताच अपर आयुक्तांनी नाशिक प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी तसेच मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या प्लांट मॅनेजरसह घटनास्थळी भेट दिली व विद्यार्थ्यांच्या भोजनात तत्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले, असेही डॉ. गावित यांनी सांगितले. चौकशी समितीने मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृह येथे चौकशी केली असता, मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील अन्नधान्यात अळ्या आढळून आल्या नाहीत. सदर दिवशी इतर ४१ शाळांनाही भोजनाचा पुरवठा झालेला होता. सदरील शाळांकडून जेवणात अळी निघाल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button