फडणवीसांना स्टंट आणि सनसणाटी निर्माण करण्याचा छंद जडलाय : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनसणाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. फडणवीस संभ्रम निर्माण करत आहेत. पूर्वी विरोधी पक्षनेते असतानाचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यांच्यात खूप फरक दिसतोय. त्यांना स्टंट आणि सणसणाटी निर्माण करण्याचा छंद का जडलाय माहित नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आज (दि.२५) माध्यमांशी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे असोत किंवा आदित्य ठाकरे, आम्ही वैचारिक विरोधक आहोत. मात्र, आमच्यात कसलेही शत्रुत्व नाही. अलीकडे शत्रुत्व पाहायला मिळते. ते संपवावे लागले, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी गुरूवारी केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज खासदार राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला, ते म्हणाले की, “एवढ्या दिवसांनी सनसणाटी निर्माण करून फडणवीस काय दाखवू इच्छितात ते पाहवं लागेल. उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री पदाचीच ऑफर दिली होती. आता ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजून कधीपर्यंत राहावं लागेल सांगता येत नाही, ही दिल्लीची मर्जी आहे मज्जा करा.”
भाजप पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करत आहे, असा आरोप कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, याआधीही अशी प्रकरणे उघड झाली आहेत. ते पुराव्यासह स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कसब्याचे उमेदवार धंगेकर यांनी आरोप केला असेल तर त्यांच्याकडे पक्की माहिती असेल, असे ते म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, देशभरातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. २०२४ ची तयारी सुरू केली आहे. काल दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. राष्ट्रीय राजकारणावर काही भूमिका ठरवल्या आहेत, त्या भविष्यात समोर येतील. केजरीवाल लढवय्या नेते आहेत. त्यांना राज्यपालांच्या आणि केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून दिल्लीत छळ केला जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
हेही वाचा :
- RBI ची ‘या’ बँकांवर मोठी कारवाई, महाराष्ट्रातील २ बँकांचा समावेश, पैसे काढण्यावर निर्बंध
- आ. हसन मुश्रीफ- समरजित घाटगे यांच्यातील संघर्ष टोकाला
- राजकीय द्वेषापोटी शेतकर्यांचा गळा घोटू नका : राष्ट्रवादी काँग्रेस