Assembly Election 2019 : पहाटेच्या शपथविधीची कबुली अन् गुगली … | पुढारी

Assembly Election 2019 : पहाटेच्या शपथविधीची कबुली अन् गुगली ...

मुंबई : नरेश कदम : २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या झालेल्या शपथविधीवर फडणवीस यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवार यांनीही आता कबुली दिली आहे. मात्र राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी ती राजकीय खेळी केली होती, या शरद पवार यांच्या कबुलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Assembly Election 2019)

२०१९ ची निवडणूक भाजपसोबत लढविणाऱ्या शिवसेनेने निकालानंतर भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला. पण एकीकडे शिवसेनेसोबत आघाडीची सत्ता स्थापन करण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन दिल्लीत भाजपच्या शिर्षस्त नेत्यांशी राज्यात सत्तास्थापनेच्या वाटाघाटी करत होते. आमचे खातेवाटप आणि पालकमंत्रीही ठरले होते, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. ते आधीही या विषयावर बोलले होते. पण त्यावेळी राष्ट्रवादीकडून त्याला दुजोरा मिळाला नव्हता. मात्र आता दस्तूरखुद्द शरद पवार यांनी कबुली दिल्यामुळे पहाटेचा शपथविधी हा पवारांच्या संमतीने झाला होता हे सिद्ध होते. मात्र तरी पवार बोलले तसे राष्ट्रपती राजवट हटविण्यासाठी ही खेळी खेळली असे एकवेळ समजले तरी त्यावेळी याबाबत शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला याबाबत विश्वासात घेतले होते का ? असा प्रश्न पडतो.

Assembly Election 2019 : राष्ट्रपती राजवट हटविण्याची

राष्ट्रपती राजवट हटविण्याची ही चाल खेळली असे पवार म्हणाले असले तर अजित पवार यांना यात प्यादे बनविले. त्या शपथविधीने अजित पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेला तडा गेला. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात गद्दारीच्या घोषणा दिल्या गेल्या. तेही नाटक होते का, असा प्रश्न आहे. त्यामुळे आजही अजित पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात, अशा चर्चा पक्षांतर्गत विरोधक करत असतात. यामागे अजित पवार यांना बाजूला करून दुसरे नेतृत्व पवार यांना पुढे आणायचे आहे का..

फडणवीस यांनी वारंवार हे गौप्यस्फोट केले. पण राष्ट्रपती राजवटीचे कारण भूतकाळातील पवारांचे भाजपसोबतच्या संबंधांची उदाहरणे बघता पटणारे वाटत नाही. पवार यांनी भाजपला राजकीय फायदा मिळावा यासाठी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच भाजपला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने बिनशर्त पाठिंबा दिला होता. यामागे राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या चौकशी थांबविण्याचे कारण होते का, असेही बोलले जाते. पहाटेच्या शपथविधीस एक वेगळी राजकीय किनार आहे.

फडणवीस यांचे वाढते राजकीय वर्चस्व पवार यांना खुपत होते. त्यामुळे पुन्हा ते मुख्यमंत्री पदावर बसले तर राष्ट्रवादीला धक्का बसू शकतो हे त्यांना माहीत होते. तसेच राष्ट्रवादीचे अनेक नेते पवारांच्या नाकाखालून फडणवीस यांनी भाजपमध्ये आणले होते. त्यामुळे फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही, अशी पवारांची खेळी होती. त्यात ते यशस्वी झाले. एकाच वेळी पवारांनी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांना धक्का दिला; पण फडणवीस यांनी पवारांशी तडजोड केली नाही. ते अडीच वर्षे लढत राहिले आणि पवारांनी बनवलेले आघाडी सरकार उलथवून टाकले. पवार आणि भाजप हा आताचा विषय नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असतानाही पवार हे त्यांच्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्री होणार अशा वावड्या उठल्या होत्या… ते झाले नाही. पण काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपसोबत संबंधाच्या चर्चा पवारांही हव्या असतात.

पवार यांची खेळी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांना कळली नाही. पवार यांनी एकाचा वेळी भाजप आणि शिवसेनेशी सत्तेच्या वाटाघाटी केल्या. त्यांनी शिवसेनेला आपल्या आणि काँग्रेसच्या सोबत आणून बसविले. भाजपसोबत शिव- सेनेच्या बिघडलेल्या संबंधाचा पुरेपूर फायदा उठवला. यात उद्धव ठाकरे यांना सत्तेच्या राजकारणात उतरवून त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड केल्या.

हेही वाचा

Back to top button