अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखविले अन् राष्ट्रपती राजवट उठली

अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचे पत्र दाखविले अन् राष्ट्रपती राजवट उठली
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाता जाता गौप्यस्फोट करून पुन्हा एकदा राजकीय चर्चेला खमंग फोडणी दिली आहे. अजित पवार यांनी आमदारांच्या सह्या असलेले पत्र दाखविले. त्यामुळेच महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठली. त्यानंतर सरकार अस्तित्वात आले होते, असा दावा कोश्यारी यांनी सोमवारी केला. त्यांनी एका संकेतस्थळाला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार कसे बनले, यावर विवेचन केले.

पहाटेच्या वेळी फडणवीस आणि अजित पवार यांना दिलेली शपथ हा आपला निर्णय योग्यच असल्याचे कोश्यारींनी ठासून सांगितले. ते म्हणाले, माझ्याकडे रात्रीच फडणवीस आणि अजित पवार हे आमदारांची यादी घेऊन आले. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. त्यांनी आपल्या आमदारांच्या सहीचे पत्र आणले होते. त्यांनी फडणवीस यांना पाठिंबा देऊन एकत्रितरीत्या सत्ता स्थापन करण्याची तयारी दाखविली. सरकार बनविण्यासाठी आवश्यक बहुमत असल्याची खात्री झाल्यावर मी राष्ट्रपती राजवट उठवून त्यांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. आता हा शपथविधी पहाटे झाला, त्यात काहीही गैर नाही. तो कधी व्हावा याच्याशी माझा संबंध नाही. फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यामुळे त्यांना पहाटे शपथ दिली गेली, असे कोश्यारी यांनी स्पष्ट केले. आपण हा निर्णय घटनेच्या चौकटीत घेतला होता. अजित पवार काही मामुली व्यक्ती नव्हते. तेच पुढे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांचे पत्र पाहूनच फडणवीस – अजित पवार यांचा शपथविधी करण्याचा निर्णय झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंवर कडक टीका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याऐवजी आपला पक्ष सांभाळला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी कडवट टीकाही कोश्यारी यांनी केली. मला त्यांनी विमानातून खाली उतरविले होते. आज त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून खाली उतरावे लागले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांना अनेक मुद्द्यांवर त्यांनी खडे बोल सुनावले. उद्धव यांनी मुख्यमंत्री होणे हीच त्यांची चूक होती, असे कोश्यारी म्हणाले. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना काहींनी बळी दिले. दुसर्‍याचे ऐकून ते फसले. मुख्यमंत्रिपद सांभाळणे हे त्यांचे कामच नव्हते. त्यांनी पक्ष सांभाळणे योग्य ठरले असते, असेही ते म्हणाले.

दमबाजी केल्याने यादी रोखली

कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी शिफारस केलेली बारा सदस्यांची यादी शेवटपर्यंत रोखून धरली. त्या मुद्द्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मला 12 नावांची शिफारस करताना उद्धव ठाकरे यांनी पाच पानांचे पत्र लिहिले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत कायदे सांगता. पत्रातून दमबाजी केल्याने हा निर्णय टाळला, असे कोश्यारी यांनी स्पष्ट केले. अशा पत्राऐवजी उद्धव यांनी शिष्टाचार पाळून पाच ओळीत नावासह पत्र द्यायला हवे होते, असेही त्यांनी सुनावले.

उद्धव अडकले होते शकुनीमामाच्या जाळ्यात

माझे त्यांच्याशी संबंध चांगले होते. मात्र, त्यांचे सल्लागार कोण होते ते माहीत नाही? त्यांचे आमदार येऊन सांगत होते की, आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे शकुनीमामाच्या जाळ्यात अडकले होते. माहिती नाही कोण होता तो शकुनीमामा, अशी बोचरी टिप्पणी करताना जर त्यांना शरद पवारांसारख्या राजकारणातील खाचाखोचा माहीत असत्या तर त्यांनी असे पत्र लिहले असते का, असा सवालही कोश्यारी यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news