Raju Shetti | शेतकऱ्यांचा करंट महावितरणला सोसणार नाही: राजू शेट्टी | पुढारी

Raju Shetti | शेतकऱ्यांचा करंट महावितरणला सोसणार नाही: राजू शेट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकऱ्यांना जादा शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा अजून ब-याच भानगडी माझ्याकडे आहेत. त्यासाठी मुंबईतील प्रकाशगड समोर घोंगडे टाकून हिशोबाला बसूया, मग समजेल कोण किती पाण्यात आहे ते ?, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महावितरणाला दिला आहे.

याबाबत शेट्टी (Raju Shetti) यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महावितरणचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक विजय सिंघल हे राज्यातील शेतक-यांना ७ रूपये ३५ पैसे दराने तयार होणारी वीज १ रूपये ५० पैसे दराने देऊन ८५ टक्के सवलत देत असल्याचा बागलबुवा करत आहेत.
पंधरा टक्के गळती म्हणजे दरवर्षी किमान 12 हजार कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचार आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा नियोजन मंडळातून आयपीडीएस योजनेअंतर्गत ५ कोटी रूपयाचे एक काम एका ठेकेदाराने ३ टक्के बिले भरणा-या ठेकेदाराला थांबवून १२ टक्के जादा दराने निविदा भरलेल्या ठेकेदारास हे टेंडर दिले आहे.

तेथील पालकमंत्री व अधिक्षक अभियंता संबंधित ठेकेदारावर निविदा माघार घेण्यास दबाव आणत आहेत. या दोन्ही कंपन्यांमधील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि नियोजनाचा संपूर्ण अभाव यामुळे महावितरण तोट्यात जात आहे. याबद्दल विजय सिंघल यांनी खुलासा करावा, अशी मागणीही शेट्टी यांनी ट्विटमध्ये केली आहे.

हेही वाचा 

Back to top button