Ajit Pawar : ठाकरे गट -वंचितच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे ? : अजित पवार | पुढारी

Ajit Pawar : ठाकरे गट -वंचितच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे ? : अजित पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (दि.२४) पत्रकार परिषदेत बोलत होते.

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले आहे. उध्दव ठाकरे यांची आज मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट घेणार आहोत त्यावेळी यावर स्पष्टपणे चर्चा करु व त्यानंतर आमची भूमिका मांडू असे स्पष्ट करतानाच उध्दव ठाकरे यांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचं व त्यांच्या कोट्यातून घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असे पवार (Ajit Pawar) म्हणाले. राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या. याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात. राजकीय भूमिका मांडावी लागते. युती – आघाडी होते त्यावेळी ‘मागचं झालं गेलं गंगेला मिळालं’, असे करुन पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात.

मुळात मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे याअगोदरच उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला बरोबर घ्या, अशी सकारात्मक चर्चा झाली होती, अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांसंदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेससोबत चर्चा करतोय. याशिवाय जे घटक पक्ष आहेत. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणुका लढवल्या जाव्यात, ही भूमिका असून याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगितला जाईल, असेही पवार म्हणाले.

एखाद्याची महत्त्वाची नेमणूक ज्यांनी केली आहे. त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करायची असते, त्यातूनच राज्यपालांनी ती इच्छा व्यक्त केली असावी, असे मत अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधान परिषदेच्या निवडणुका, चिंचवड व कसबा पोटनिवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय नीती असावी, याबाबत चर्चा झाल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.

Ajit Pawar : शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही – जयंत पाटील

शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी, अशी इच्छा आणि सतर्कता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचलंत का ?

Back to top button