कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ढासळली, 'असर' चा अहवाल | पुढारी

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ढासळली, 'असर' चा अहवाल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोरोनामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ढासळली आहे. 2018 च्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत सर्वच विषयांत विद्यार्थ्यांची घसरण झाली आहे. वाचनशैलीही बिघडली आहे. अनेकांचे गणितही कच्चे झाले आहे. इयत्ता दुसरीचा धडा आठवीच्या विद्यार्थ्यांना वाचता येईना झाला आहे. 2018 मध्ये वर्गातील 80.2 टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत होते ते 2022 मध्ये 76.20 इतके घसरले आहे. दुसरीचे गणितही पाचवीच्या विद्यार्थ्यांना येईनासे झाले आहे. अनेकांना हातावर मोजून करणारी वजाबाकी किंवा भागाकाराचे गणित येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

पिरामल ग्रुप आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्या हस्ते बुधवारी शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणार्‍या ‘असर’ अहवालाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे करण्यात आले. चार वर्षांच्या कालावधीनंतर देशभरात 616 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ‘असर’चे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोनामुळे शाळा दीर्घकाळ बंद राहिल्या. त्यानंतर शाळा पुन्हा उघडल्या गेल्यानंतर ‘असर’ सर्वेक्षण करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन केलेल्या या सर्वेक्षणात 3 ते 16 वयोगटातील मुलांची शालेय स्थिती नोंदवली गेली आणि 5 ते 16 वयोगटातील मुलांचे मूलभूत वाचन आणि गणिताचे मूल्यांकन केले गेले. यावर्षी मुलांच्या इंग्रजी क्षमतेचीही चाचणी घेण्यात आल्याचे ‘असर’ अहवालात म्हटले आहे. राज्यातील 33 ग्रामीण जिल्ह्यांतील 983 गावांतील 19 हजार 396 घरांमधील 34 हजार 280 मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणामधून ही शैक्षणिक अवस्था समोर आली आहे.

देशभरात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत वाचन क्षमतेतही घट झाली आहे. 2022 मध्ये सरकारी किंवा खासगी शाळांमध्ये इयत्ता आठवीत प्रवेश घेतलेल्या मुलांपैकी 69.60 टक्के मुले किमान मूलभूत पाठ वाचू शकतात, हे प्रमाण 2018 मध्ये 73 टक्के होते; तर राज्यात इयत्ता दुसरीच्या स्तराचा पाठ वाचू शकणार्‍या मुलांची टक्केवारी 2018 मध्ये 80.20 टक्क्यांवरून 2022 मध्ये 76.20 टक्क्यांपर्यंत घसरली असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

‘असर’ चाचणीत 1 ते 9 पर्यंतचे अंक, 11 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखू शकतात का? याची पाहणी करण्यात आली. 2 अंकी संख्येच्या हातच्याची वजाबाकी किंवा भागाकाराचे गणित बरोबर सोडवू शकतात का, हे पहिल्यानंतर प्राथमिक इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंकगणित स्तरामध्ये 2018 पेक्षा घट झालेली आहे. देशात किमान वजाबाकी करू शकणार्‍या इयत्ता तिसरीमधील मुलांचा आकडा 2018 मध्ये 28.10 टक्क्यांवरून 2022 मध्ये 25.9 टक्क्यांपर्यंत घसरला. राज्यातील शाळांतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी किमान वजाबाकी सोडवू शकतात अशा मुलांचे प्रमाण 2018 मध्ये 27.20 टक्क्यांवरून 2022 मध्ये 18.70 टक्क्यांपर्यंत घसरले असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

इयत्ता पाचवीत सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेली 20.10 टक्के मुले भागाकाराची गणिते करू शकणारी आहेत, तर खासगी शाळांतील मुलांचे हे प्रमाण 18.8 टक्के इतके असल्याचे दिसून आले. आठवीच्या अंकगणितातील शासकीय शाळेत जाणारी 38.1 टक्के मुले भागाकाराची गणिते करू शकली, तर खासगी शाळांतील मुलांचे हे प्रमाण 32.3 टक्के असल्याचे दिसले. म्हणजेच इयत्ता आठवीतील शासकीय शाळांतील मुले खासगी शाळांतील मुलांपेक्षा भागाकारात चांगली कामगिरी करत असल्याचे दिसल्याचे अहवालात नमूद केले आहे.

इंग्रजी विषयात मोठी अक्षरे, छोटी अक्षरे, सोपे शब्द आणि सोपी वाक्ये वाचू शकतात का, हे पाहिल्यावर राज्यात हे प्रमाण 51.10 टक्के इतके आहे. इयत्ता तिसरीच्या सर्व मुलांपैकी 53.30 टक्के मुले वाक्यांचा अर्थ सांगू शकली, तर इयत्ता आठवीच्या सर्व मुलांपैकी 72.70 टक्के विद्यार्थी मुले वाक्यांचा अर्थ सांगू शकली असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

तिसरीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचा धडा वाचता येईना; 16 टक्क्यांनी घसरण

राज्यात तिसरीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दुसरीचा धडा वाचता येत नाहीय. दुसरीचा धडा वाचू शकणार्‍या सरकारी व खासगी शाळांतील मुलांची टक्केवारी 2018 मध्ये 42 टक्के होती. ती 2022 मध्ये 26.6 टक्क्यांपर्यंत घसरली आहे; तर इयत्ता दुसरीच्या स्तराचा पाठ वाचू शकणार्‍या इयत्ता पाचवीमधील सरकारी व खासगी शाळांतील मुलांची टक्केवारी 2018 मध्ये 66.50 होती. ती 2022 मध्ये 55.50 टक्क्यांपर्यंत घसरली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Back to top button