राज्य मंत्रिमंडळाचा १५ दिवसांत अंशतः विस्तार शक्य
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन सात महिने उलटले आहेत; मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही… जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अंशतः मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, यामध्ये २२ पैकी १० मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
अंशतः विस्तारामध्ये २ कॅबिनेट व ८ राज्यमंत्रिपदांचा समावेश असणार आहे. शिंदे गटामध्ये मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामुळे कोणाला मंत्रिपद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे व बच्चू कडू यांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, यामध्ये कोणाला संधी मिळणार आहे, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हेच निर्णय घेतील, असे मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले आहे. तर भरत गोगावले यांनी केवळ मंत्रिपदच नाही, तर रायगडच्या पालकमंत्रिपदाचादेखील शब्द दोन्ही नेत्यांकडून देण्यात आल्याचे सांगितले आहे.