मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मरोळ येथे शहरी जंगल उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. येथे मियावाकीच्या धर्तीवर झाडांची जवळजवळ लागवड करून शहरी जंगल उभारले जाणार आहे. यासाठी तब्बल ६ कोटी ९२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या 'निधी नावीन्यपूर्ण योजने' अंतर्गत पश्चिम उपनगरातील मरोळ येथे शहरी जंगल तयार केले जाणार आहे. यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून यातून वनीकरणासोबत जैवविविधता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे हे शहरी जंगल मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. या प्रकल्पाला महापालिका आयुक्तांकडून मंजुरी मिळाली असून, लवकरच याचा प्रारंभ होणार आहे.
मुंबईत वाढणाऱ्या शहरीकरणामुळे वनांची आणि झाडांची संख्या कमी झाली. वृक्षारोपणासोबत मियावाकी पद्धतीच्या जंगलांची निर्मिती केली आणि पर्यावरणासाठी केलेल्या चांगल्या कामासाठी मुंबई महापालिकेला ग्रीन सिटी ऑफ द वर्ल्डने युनायटेड नेशन्स फूड अँड ग्रीकल्चर ऑर्गनायझेशन सन्मानित करण्यात आले आहे. मरोळ येथील मोकळ्या जागेत वनीकरण करणे, वनीकरण केलेल्या जागेत ठराविक कलाकृतींचे चित्र प्रदर्शनाकरिता कलादालने उभी करणे, बांबूंच्या सहाय्याने प्रदर्शन केंद्र, प्रथमोपचार, तिकीट घर तयार करण्यात येणार आहे. त्यासोबत विविध पक्षी, फुलपाखरे यांना आकर्षित करण्याकरिता विविध प्रकारची झाडे, फुलझाडे यांच्या विविध प्रजातींची लागवड करून जैवविविधता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.