सरकारी कार्यालये ‘पेपरलेस’ होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा | पुढारी

सरकारी कार्यालये 'पेपरलेस' होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. केंद्राच्या धर्तीवर राज्यातदेखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व कार्यालये ‘ई- ऑफिस वापरू लागले की मोबाईलवरदेखील कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे पाहता येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय सुधारणांच्या क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राज्यात सुप्रशासनविषयक मार्गदर्शिका तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना देतानाच देशात सुप्रशासन निर्देशांकात द्वितीय क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

   सार्वजनिक तक्रारींवरील कार्यवाहीचा मुख्यमंत्री घेणार आढावा

सर्वसामान्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षापूर्तीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या सार्वजनिक तक्रारींच्या निवारणासाठी ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. या तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग करण्यात येईल. तक्रारींवर विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे. या सार्वजनिक तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा स्वतः आढावा घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

  प्रत्येक विभागाची आणि जिल्ह्याची होणार ‘गुड गव्हर्नन्स रैंकिंग’

सध्या महाराष्ट्रात फक्त राज्यस्तरावर सुशासन पद्धतीचे पर्यवेक्षण होते. आता शासनाच्या प्रत्येक विभागाचे आणि जिल्ह्याची गुड गव्हर्नन्स रैंकिंग केली जाणार आहे. शासकीय विभाग आणि जिल्ह्यांच्या प्रशासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांची, सुशासनाची क्रमवारी निश्चित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

        फाईल्सचा प्रवास होणार कमी

  •  सध्या मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारी फाईल ८ विविध स्तरांमधून येते. या अधिकच्या स्तरांमुळे संबंधित विषयांच्या फाईल्सवर निर्णय होण्यास विलंब लागतो हे लक्षात घेऊन गतिमान कारभारासाठी फाईल्स सादर करण्याचे स्तर कमी करण्याच्या सूचना देतानाच फक्त चार स्तरांवरूनच ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
  •  ऑनलाईन सेवांची संख्या वाढणार
  •  ई-सेवा निर्देशांकातदेखील महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी जास्तीत-जास्त सेवांची संख्या वाढविण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. सध्या राज्यातील ४५० सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत.

 

 

Back to top button