नाव आणि चिन्ह गोठविणार्‍यांनी अंधेरीतून पळ काढला : उद्धव ठाकरे | पुढारी

नाव आणि चिन्ह गोठविणार्‍यांनी अंधेरीतून पळ काढला : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  निवडणूक आयोगाने आपले नाव आणि चिन्ह काही ठरावीक काळासाठीच गोठवले आहे. आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर ते आपल्याला पुन्हा मिळणार, असा विश्वास व्यक्त करतानाच माझ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवलेत तरीही तुम्ही पळालात, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला.

बुलढाणा आणि कोकणातील शिवसैनिक धगधगती मशाल हाती घेऊन मंगळवारी मातोश्री निवासस्थानी धडकले. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव म्हणाले, केवळ मन:स्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, छळायचे आणि शिवसेना
संपवायची याच हेतूने पक्ष, नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. आपल्याला अडवण्याचे बरेच प्रयत्न झाले आणि होत आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले तरी मशाल घेऊन तुम्ही पुढे जात आहात. प्रत्येक चिन्हाचे,
शस्त्राचे एक महत्त्व असते. मशाल अन्यायाला जाळते. अंधारात वाट दाखवते. ती मशाल आता आपल्याकडे आहे.
ती पुढे घेऊन जात काम करूया, असे आवाहनही ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. लवकरच आपण महाराष्ट्र दौरा करणार असून बुलढाण्यात येऊन सभा घेणार असल्याचेही उद्धव यावेळी म्हणाले.

राजापूरचे आ. राजन साळवी हेसुद्धा आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर आले होते. गद्दारांनी अनेक आमिषे दाखवली, पण राजन साळवी कोणत्याही आमिषाला बळी न पडता खंबीरपणे आपल्यासोबत आहेत, अशा शब्दांत उद्धव
ठाकरे यांनी साळवी यांचे कौतुक केले. गद्दारांनी आपल्याशी गद्दारी केली, पण त्यांच्या छाताडावर नाचून आपण भगवा फडकवू, असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Back to top button