

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; बुधवारी होणार्या दोन दसरा मेळाव्यांमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने उभे ठाकणार असून, दोघांतील संघर्ष दसर्याच्या मुहूर्तावर नव्या वळणावर पोहोचण्याची चिन्हे आहेत. खरी शिवसेना कुणाची, याचा फैसला निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर प्रलंबित असताना ठाकरे आणि शिंदे या मेळाव्यांच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाच्या पातळीवर उतरले आहेत. (Dasara Melava 2022 )
शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर तर शिवसेनेचा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होत आहे. बीकेसी मैदानाची आसनक्षमता एक ते सव्वा लाख असली तरी शिंदे गटाने किमान 5 लाख कार्यकर्ते मुंबईत धडकतील इतक्या गाड्यांची व्यवस्था केली आहे. शिवाजी पार्कची बैठक क्षमता 80 हजार ते 1 लाख असली तरी तिथेही मैदान ओसंडून गर्दी उरेल अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या राज्यभरातील पदाधिकार्यांनीही शक्य तितक्या गाड्या बुक करून शिवसैनिकांच्या प्रवासाची सोय केली आहे, तर मुंबईत या शिवसैनिकांसाठी सोयी-सुविधांची जय्यत तयारी शिवसेनेच्या शाखांनी केलेली दिसते.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना साद घालत मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खास निमंत्रण आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित करून ते व्हायरल केले आहे. एकूण तयारी पाहता शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही मैदानांवरील दसरा मेळावे दणदणीत होण्याची चिन्हे आहेत. आता महाराष्ट्राचे लक्ष आहे ते ठाकरे आणि शिंदे यांच्या भाषणांकडे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी करत भाजपसह सत्तांतर घडवले आणि त्यात शिवसेनेची दोन शकले उडाली. गेले चार महिने हे दोन्ही गट एकमेकांवर सतत तुटून पडत असताना आता दसरा मेळाव्यातील भाषणात कोणती नवी हत्यारे उपसली जातात, याबद्दल राज्यभर प्रचंड कुतूहल आहे.
मूळ शिवसेनेवर दावा सांगणार्या शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरही हक्क सांगितला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कची लढाई न्यायालयात जाऊन जिंकली. शिंदे गटाने आधीच बांद्रा येथील बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याची तयारी केली होती. आता कोण मैदान मारतो ते बुधवारी दिसेल.