मुंबई : थकीत रक्कम मिळण्याआधीच एस.टी.च्या 110 कर्मचार्यांचा मृत्यू
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे दिले जातात. परंतु 2019 पासून तब्बल 8 हजार 500 निवृत्त झालेल्या कर्मचारी व अधिकार्यांना ही रक्कम अद्याप दिलेली नाही. सेवानिवृत्त कर्मचार्यांची सुमारे 210 कोटी रुपये इतकी देणी थकीत आहे. 110 पेक्षा जास्त कर्मचार्यांचा त्याआधीच मृत्यू झाला आहे.
एसटी महामंडळ गेल्या काही वर्षांपासून आर्थिक तोट्यात आहे. त्यातच कोरोनामुळे मार्च 2020 पासून एसटीची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याने तोट्यात आणखीनच वाढ झाली. उत्पन्नच घटल्याने निवृत्त कर्मचार्यांची थकीत देणी देणे महामंडळाला अवघड झाले आहे. तर आपल्या हक्काचे पैसे घेण्यासाठी कर्मचार्यांना महामंडळाच्या विभागीय कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत.