अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबीयांना खाेचक सल्‍ला म्‍हणाल्‍या, "सक्षम लोक कायम..." | पुढारी

अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबीयांना खाेचक सल्‍ला म्‍हणाल्‍या, "सक्षम लोक कायम..."

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :

“सक्षम लोक कायम टिकतात, प्रतिकूल परिस्थिती कायम राहत नाही”, असा खोचक सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबीयांना दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्‍यांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी आता फारसे काही बोलण्यासारखे राहिलेले नाही, असेही सांगितले.

दोन अडीच वर्षांपूर्वी खूप काही सांगितले – अमृता फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात ठाकरे कुटुंबीयांवर बोचरी टीका केली. त्यामुळे अनेकदा वादही झाले. यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्याला प्रत्युत्तर देत अमृता फडणवीसांना लक्ष केले हाेते. आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या आगमनासह अमृता फडणवीस चर्चेत आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी पूर्वीच खूप बोलल्यामुळे नवीन काही सांगण्यासारखे नाही, असे सांगितले. ठाकरे कुटुंबीयांना आता काही सांगायची माझी इच्छा नाही. मला जे सांगायचे होते ते मी दोन अडीच वर्षांपूर्वी खूप काही सांगितले आहे. आता प्रत्येक व्यक्ती विषयी इतकी जनजागृती झाली आहे की नवे काही सांगण्यासारखे राहिलेले नाही. मी त्यांना फक्त एवढेच सांगेन की ‘सक्षम लोक कायम टिकतात, प्रतिकूल परिस्थिती कायम राहत नाही’

जमेल तेवढी समाजसेवा करायचीयं 

मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मला माझे घर आणि काम सांभाळून जमेल जितकी लोकसेवा, समाजसेवा करायची आहे. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकेन तिथे मी पुढाकार घेऊन करून दाखवेन, असेही अमृता फडणवीस यांनी नमूद केले.

ते कधीकधी चष्मा, हुडी घालून बाहेर पडायचे

अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस खूप उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे मला जास्त लक्षात आले नाही; पण कधीकधी ते चष्मा व हुडी घालून बाहेर पडायचे. अनेकदा ते मलाही ओळखू यायचे नाही. मी त्यांना एवढ्यात नवीन काय सुरू आहे असे विचारले तर ते उत्तर देणे टाळायचे. काही ना काही सुरू आहे, असे मला वाटत हाेते. शेवटच्या दोन तीन दिवसांत मला सरकार बदलाची कल्पना आली, असेही त्‍यांनी सांगितले.

शिवसेनेतील अस्वस्थता कुठे ना कुठे निघणार होती

एकनाथ शिंदे यांचे भाषण सर्वांनी ऐकले. त्यातून शिवसेनेच्या सर्वच लोकांमध्ये किती अस्वस्थता होती ते लक्षात येते. विशेषतः आमदार व कार्यकर्त्यांमध्ये ही अस्वस्थता होती. ती कुठे ना कुठे निघणार होती. त्याला जागा देण्याचे काम भाजपाने केले आहे. त्या आमदारांच्या अडचणीत त्यांच्या मागे उभे रहायचा निर्णय भाजपाने घेतला आणि तो चांगलाच आहे,” असेही अमृता फडणवीस या वेळी म्‍हणाल्‍या.

हेही वाचलंत का?

Back to top button