पूरग्रस्‍तांना सुरक्षित स्‍थळी हलवा, 'एनडीआरएफ' पथकांना सज्ज ठेवा : मुख्‍यमंत्री शिंदेंचे निर्देश | पुढारी

पूरग्रस्‍तांना सुरक्षित स्‍थळी हलवा, 'एनडीआरएफ' पथकांना सज्ज ठेवा : मुख्‍यमंत्री शिंदेंचे निर्देश

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्‍यातील काही भागांमध्‍ये मुसळधावर पावसाचा अंदाज व्‍यक्‍त केला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्‍यास काही जिल्‍ह्यांना पूराचा धोका आहे. तसेच जिवित व मालमत्ता हानी होण्‍याची भिती आहे. याबाबत मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. पूर परिस्‍थितीत नागरिकांना सुरक्षित स्‍थळी हलविण्‍यात हलवा. राष्‍ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) पथकांना सज्‍ज ठेवा, असा आदेश यावेळी मुख्‍यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.

विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या

Back to top button