शिवसेना संपवणे हाच भाजपचा डाव;भास्कर जाधव
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भाजपचा 25 वर्षांचा इतिहास बघितला, तर शिवसेना संपवणे हाच भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. शिवसेनाविरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत, यामुळे आता रक्तपात होईल आणि डोकी फुटणार ती शिवसैनिकांची. या ठिकाणी घायाळ होतील ते फक्त शिवसैनिक होतील, तेव्हा दोन पावले माघारी या. तुम्ही शिवसेना फुटू दिली नाही, तर हा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, असे आवाहन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना सोमवारी विधानसभेत केले.
अभिनंदन प्रस्तावावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा मी आनंद व्यक्त करतो; पण तुमच्याबद्दल भाजपला काहीही प्रेम आलेले नाही. याची अनेक उदाहरणे मी सांगू शकतो. हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेनाविरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत.
एका बाजूला तुमच्याकडे 40 शिलेदार उभे आहेत, दुसर्या बाजूला सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेला वाचवायला उभा आहे. तेव्हा कोण कोणाला धारातीर्थी पाडणार याचा विचार करा. खरा योद्धा तो असतो त्याला कुठे थांबायचे हे कळते. पानिपतच्या लढाईत जे झाले ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रात युद्ध सुरू आहे. महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे भाऊ एकमेकांसमोर उभे राहून लढतील, असे जाधव म्हणाले.
तुम्ही सगळ्या मराठी माणसांवर ‘ईडी’ लावत आहात. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे किती लोक तुम्ही पवित्र करून घेतले आहेत, असे सांगत जाधव यांनी त्यांची यादीच वाचून दाखवत तुम्ही किती जणांना धुऊन घेणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित
केला.