राज्यात पेट्रोल-डिसेलवरील व्हॅट कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा | पुढारी

राज्यात पेट्रोल-डिसेलवरील व्हॅट कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात ९९ जणांची मतदान केले. दरम्यान, विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज २० आमदार गैरहजर होते. दरम्यान बहुमत चाचणीनंतर सभागृहातील नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी भाषण करताना अनेकांनी टोलेबाजी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार लवकरच कॅबिनेट बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यासाठी निर्णय घेणार आहे. तसेच ज्या हिरकणीने इतिहास घडवला. ते हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री भाषणात काय-काय म्हटले…

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री झालो, यावर विश्वास बसत नाही. या घटनेची ३३ देशांनी नोंद घेतल्याचे देवेंद्र फडणवीस सांगितले. स्वतःचे मंत्रिपद दाव्याला लावून ९ मंत्री, ४० आमदार, १० अपक्ष आमदार बाहेर सत्तेतून बाहेर पडले. समोर मोठमोठे नेते होते, तर दुसरीकडे शिवसैनिकावर विश्वास होता, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, स्वत:चं मंत्रीपद डावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी येणार, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही.

मी मतदानाच्या दिवशी निघून आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांची शिकवण आठवली. बाळासाहेब म्हणायचे अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही. हा या आमदारांचा मोठेपणा आहे. सुनिल प्रभु यांना माहिती आहे माझं कशाप्रकारे खच्चीकरण झालं. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही, अशी भावना शिंदेंनी व्यक्त केली.

ही छोटी मोठी घटना नाही. जे ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत सदस्यही इकडे तिकडे हलू देत नाही. पण हे एवढं मोठं का झालं, काय घडलं, कशासाठी झालं? २०-२५ वर्ष एकनाथ शिंदेने रक्ताचं पाणी केलंय. मी १७ वर्षांचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणामध्ये मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण सिनियर होते. त्यांना बोललो की यांना करा, तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, “मला शिकवतो का?”, अशी आठवण यावेळी शिंदे यांनी सांगितली.

एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला मला मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं. नंतर कुणीतरी सांगितलं मी नको, उद्धव ठाकरेंना करा. मी काहीही बोललो नाही. मला सत्तेची हाव नाही. मात्र, नंतर निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अनेक आमदार यायचे आणि म्हणायचे आपली नैसर्गिक युती भाजपासोबत आहे. यानंतर मी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. याला दीपक केसरकर साक्षीदार आहेत. मात्र, याचा परिणाम झाला नाही. अजित पवार यांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी मी त्यांना काही बोललो नाही. त्यांनी ८०० कोटी रुपये घेतले तरी मी काही बोललो नाही. मात्र, तुम्ही समांतर नगरविकास खात्याचा प्रमुख का केला?, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

Back to top button