Uddhav Thackeray Resign : ‘मविआ’ सरकार कोसळले; बंडानंतर सत्तांतर
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अखेर एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Resign) यांनी बुधवारी रात्री आपल्या सरकारचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी, गुरुवारीच अधिवेशन बोलवा आणि बहुमत सिद्ध करा, असे आदेश राज्यपालांनी उद्धव यांना दिले होते. बंडखोरांच्या अपात्रतेचा विषय न्यायप्रविष्ट असताना शक्तिपरीक्षा कशी? असा सवाल करीत शिवसेनेने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र, न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळताच रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा जाहीर केला आणि राजभवन गाठले. शिवसेनेतील बंडाळीचे ओझे असह्य होऊन ठाकरे सरकार कोसळल्याने महाराष्ट्रात सत्तांतर होत असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पुन्हा स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर गट गोव्यात दाखल झाला आहे. उद्या, गुरुवारी विधानसभेत हंगामी अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवार, दि. 1 जुलै रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. (Uddhav Thackeray Resign)
गुरुवारीच भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर गटही मुंबईत दाखल झालेला असेल. संध्याकाळपर्यंत नव्या सरकारच्या स्थापनेचे चित्र स्पष्ट होईल आणि भाजपकडून सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाईल. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. याचा अर्थ येत्या 10 जुलै रोजी पंढरपुरात होणार्या आषाढीच्या महापूजेचा मान मुख्यमंत्री म्हणून पुन्हा फडणवीस यांनी स्वत:कडे खेचून आणला आहे. (Uddhav Thackeray Resign)
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray tendered the resignation of his post to Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai.
The Governor accepted the resignation and asked Shri Thackeray to officiate as Chief Minister until alternate arrangements are made. pic.twitter.com/lK1lgR5Jhg
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 29, 2022
दि. 20 जून रोजी विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावत 30 आमदारांना घेऊन सुरत गाठले. तेथून गुवाहाटीत मुक्काम हलवला. 10 दिवसांत शिंदे गटात शिवसेनेचे 39 आणि अपक्ष 11 आमदार असे एकूण 50 आमदार सामील झाले. मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सरकार अल्पमतात आल्याचे सांगितले आणि शक्तिपरीक्षेची मागणी केली. या पत्राची दखल घेत गुरुवारी सकाळी राज्यपालांनी विधिमंडळ सचिवालयाला पत्र पाठवून गुरुवारीच विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश देत ठाकरे सरकारला शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यास सांगितले. (Uddhav Thackeray Resign)
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/ogsYKE1vvk
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2022
राज्यपालांच्या या आदेशाला शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रलंबित असताना हा विश्वासदर्शक ठराव मांडला जाऊ नये. तसेच राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यासाठी अत्यंत कमी कालावधी दिल्याचा मुद्दा या याचिकेतून मांडण्यात आला. बुधवारी सायंकाळी 5 वाजता सुरू झालेला युक्तिवाद तब्बल 4 तास चालला आणि रात्री 9 वाजता सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळून गुरुवारी होणार्या शक्तिपरीक्षेवर शिक्कामोर्तब केले. न्यायालयाचा निकाल येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. ज्यांना सत्तेची लालसा आहे त्यांना ती लखलाभ, असे सांगत ठाकरे यांनी राजीनामा जाहीर केला. त्यापाठोपाठ राजभवनावर जाऊन त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादरही केला. गेले दहा दिवस सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शेवट असा सत्तांतराने झाला. आपल्याच पक्षात झालेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Resign)
मी आता शिवसेनाभवनात बसणार आहे. एका नवीन शिवसेनेची उभारणी परत नव्या जोमाने करणार असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांनी रिक्षावाला, टपरीवाला अगदी हातभट्टीवाल्यालाही मोठे केले. आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदे दिल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आतापर्यंत ज्यांना मोठे केले, जे-जे द्यायचे ते दिले तेच आज नाराज आहेत. मात्र, ज्यांना काही मिळाले नाही ते मात्र ‘मातोश्री’वर येऊन मला साथ देत आहेत. जे नाराज झाले त्यांनी खरे तर सुरत, गुवाहाटीला न जाता ‘मातोश्री’वर येऊन तरी बोलायला पाहिजे होते. तुम्हाला आम्ही कधीतरी आपले मानले होते; मग मनातले सांगायची काय अडचण होती? असेही ते म्हणाले.
लोकशाहीचा पाळणा हलू द्या; शिवसैनिकांनो, रस्त्यावर उतरू नका
गुवाहाटीला गेलेले सर्व जण परत येतील. नव्या सरकारची स्थापना होईल. नवी लोकशाही येत आहे. लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. तो निश्चितच हलू दे. एकाही शिवसैनिकाने त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर उतरू नये. आज मुंबईत अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडया उतरल्या आहेत. कदाचित सैन्याला देखील बोलावतील. ज्या शिवसैनिकांनी या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला होता त्यांच्याच रक्ताने इथले रस्ते माखलेले मला पाहणे मला आवडणार नाही. त्यामुळे या सगळयांना आरामात मुंबईत येउ द्या. कोणीही त्यांना रोखू नये असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
उद्या होणारी फलोअर टेस्ट वगैरे प्रकारच मला आवडत नाही. केवळ डोकी मोजण्याचा हा प्रकार हे लोकशाहीचे दुर्देव आहे. मला त्यात रस नाही, असेही ते म्हणाले.
राज्यपालांनी ती यादीही मंजूर करावी
राज्यपालांनी आम्हाला तातडीने चोवीस तासाच्या आत फलोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले. लोकशाहीचे त्यांनी पालन केले. आता अडीच वर्षांपासून जी 12 विधानपरिषद सदस्यांची यादी त्यांच्याकडे पडून आहे ती त्यांनी आता तरी मंजूर करावी. तसे त्यांनी केल्यास त्यांच्याबददल आम्हाला असलेला आदर द्विगुणित होईल, असेही उदधव ठाकरे म्हणाले.
शरद पवार-सोनिया गांधींचे मानले आभार
जे विरोधात होते ते आज माझ्या सोबत उभे राहिले. पण माझीच माणसे सोडून गेल्याचे दुःख व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांचेही आभार मानले. सरकार चालविताना त्यांनी मला कायम साथ दिली.आज औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव करतानाचा निर्णय घेताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी एका अक्षरानेही विरोध केला नाही. अशोक चव्हाण तर मला म्हणाले की,तुमच्या पक्षातील काही आमदारांचा जर आम्हाला विरोध असेल तर आम्ही सरकारला बाहेरून पाठिंबा देतो. पण तुम्ही सरकार चालवा. आज संभाजीनगरचा निर्णय घेताना मी, आदित्य, सुभाष देसाई, अनिल परब हेच मंत्री होतो. पण जे पाहिजे होते ते नव्हते. हे सरकार आल्यापासून सगळे चांगले चालले होते. आम्ही महत्वाचे निर्णयही घेतले. पण चांगले चालल्याला नेहमीच नजर लागत असते. तशी या सरकारलाही ती लागली. ती कोणाची ते तुम्ही जाणता, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. आमच्या काळात राज्यात एकही धार्मिक दंगल झाली नाही. देशात सीएए,एनआरसीवरून वाद पेटलेला असताना महाराष्ट्र मात्र शांत होता.त्यासाठी मुस्लिम बांधवांनाही श्रेय दिले पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.