बंड करणारे एकनाथ शिंदे रिक्षा चालक ते शिवसेनेचे मंत्री कसे झाले? | पुढारी

बंड करणारे एकनाथ शिंदे रिक्षा चालक ते शिवसेनेचे मंत्री कसे झाले?

पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचे मोठे नेते आणि ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणारे एकनाथ संभाजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणलय. शिंदे यांनी थेट पक्ष नेतृत्वावरच नाराजी व्यक्त करत पक्षातील इतर काही आमदारांसोबत सूरत गाठले. थोडेथोडके नाही तर तब्बल 30 हून अधिक आमदार ते घेऊन गेल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत आले आहे. अशा या एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मंत्री पदापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या तालमित घडलेले एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यासोबतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही एकनाथ शिंदेंचा मोठा सहभाग होता.

ठाण्याच्या मातीत राजकिय कारकिर्दीची जडणघडण झालेले एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यामुळे लहान वयातच एकनाथ शिंदेंनी गाव सोडलं आणि ठाणे गाठले. ते तिथेच स्थायिक झाले. ठाण्यातील कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून त्यांनी शालेय शिक्षण, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून अकरावीचं शिक्षण पूर्ण केले. अशातच आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.

ठाणे येथील वागळे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ते सुरुवातीच्या काळात एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला लागले. नंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि ऑटो रिक्षा तसेच टेंपो चालवू उदरनिर्वाह करू लागले. या दरम्यान त्यांच्यावर सोन व्यक्तींचा प्रभाव पडला. एक होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे होते ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे. अठराव्या वर्षीच एकनाथ शिंदेंनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षाच्या कामाला सुरुवात केली. शिंदेच्या कामा धडका पाहून आनंद दिघे यांना त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. आपल्या कामाने शिंदे यांनी आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळख निर्माण केली. १९८४ साली वयाच्या विसाव्या वर्षी शिंदे यांच्यावर वागळेतील किसननगरच्या शाखाप्रमुख पदी नेमणुक करण्यात आली. इथूनच खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

शिंदेंनी शिवसेनेने दिलेल्या संधीचे सोनं केलं. कालांतराने त्यांचा लता शिंदे यांच्या सोबत विवाह झाला. दोघांना तीन मुलं झाली. दीपेश, शुभदा आणि श्रीकांत.१९९७ साली आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना महापालिकेचे तिकीट दिलं. ते नगरसेवक म्हणून निवडून आले. राजकीय प्रवासाला चांगली सुरुवात झाली असतानाच २००० साली शिंदेंवर दुःखाचा डोंगर कोसळला. शिंदेंची दोन मुलं दीपेश आणि शुभदा यांचा अपघाती मृत्यू झाला. या दुःखातून बाहेर येण्यासाठी दिघे यांनी शिंदेंना खूप मदत केली. दुःखातून सावरल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. २००१ साली शिंदे यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतपदी नियुक्ती करण्यात आली.

२००१ साली ते पुन्हा नगरसेवक झाले आणि पुढच्या दोनच वर्षांत त्यांना पक्षाकडून आमदारकीचं तिकीट मिळालं. २००२ ला दिघेंचे अकाली निधन झाल्यानंतर शिंदे यांनीच ठाण्यातील शिवसेनेचा डोलारा यशस्वीपणे हाताळला. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतही सेनेची सत्ता आणण्यात शिंदे यांचेच कसब होते. २००४ च्या आमदारकीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. २००५ साल हे पुन्हा त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं. एकनाथ शिंदे ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. कुणा आमदाराला पक्षातील हे पद देण्याची ही पहिलीच वेळ होती.

2009 साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. शिंदे पुन्हा आमदार झाले. पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणाची समीकरणं बदलली. शिवसेना आणि भाजपची 25 वर्ष जुनी युती संपुष्टात आली. तर दोन्ही पक्षांनी स्वबळावर 2014 ची विधानसभा लढवली. त्या निवडणुकीत शिवसेना थोडी बॅकफुटवर गेली. पण शिंदें स्वत:चा गड राखण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी एकनाथ शिंदे गटनेते झाले. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.
2019 साली राज्यात सत्तांतर झालं. भाजप काही शिवसेनेला मुख्यमंत्री पद देत नव्हतं. त्यामुळे युती पुन्हा संपुष्टात आली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. शिवसेने चक्क राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी स्थापन करत सत्ता हाती घेतली. सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा पेच कायम होताच. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, पण कोण? या शर्यतीत एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर होते. पण शरद पवारांच्या रणनितीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

अखेर या ठाकरे सकरामध्ये एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री झाले. शिवाजीपार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात 7 ते 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथा घेतली. त्यात शिंदेंचा समावेश होता. त्यांच्याकडे नगरविकास मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ठाकरे सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान, भाजपने आपला जूना मित्र पक्ष शिवसेनेवर नेहमीच निशाणा साधला. विरोधकांच्या वारंवार होणा-या आरोपांविरोधात एकनाथ शिंदे पक्षाकडून अगदी ठामपणे उभे राहिले. पण आता तेच कट्टर शिवसैनिक पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचे समोर आले आहे.

Back to top button