ईडी कारवाई : खरमाटेंकडे असलेली संपत्ती डोळे दिपवणारी; नवी मुंबई, पुणे, सांगलीत मालमत्ता | पुढारी

ईडी कारवाई : खरमाटेंकडे असलेली संपत्ती डोळे दिपवणारी; नवी मुंबई, पुणे, सांगलीत मालमत्ता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ईडीचे हे संपूर्ण प्रकरण आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्याभोवती फिरत असले तरी गतवर्षीच्या जुलैपासून परब, मुंबईतील केबल व्यावसायिक संजय कदम आणि प्रचंड मालमत्ता जमवल्याने आयकर व ईडीच्या रडारवर आलेले वादग्रस्त परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे या तीन नावांभोवती ईडीच्या कारवाया फिरत राहिल्या.

ईडीने गतवर्षी जुलैमध्ये अनिल परब यांना पहिली नोटीस बजावत चौकशीला बोलवले होते. मात्र, परब यांनी हजर होण्यासाठी ईडीकडे वेळ मागितला. त्यानंतर ईडीने 30 ऑगस्ट रोजी तीन ठिकाणी छापे टाकले. परबांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी करून काही कागदपत्रे आणि महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले होते. ईडीने खरमाटे यांच्यासह वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांचीही चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला. पुढे ईडीने अनिल परब यांना पुन्हा समन्स बजावून 28 सप्टेंबर रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार परब हजर झाले आणि ईडीच्या अधिकार्‍यांनी त्यांची सात तास कसून चौकशी केली होती. नंतरच्या काळात मात्र ईडीचा तपास थंडावला. दरम्यान, प्राप्तिकर खात्याने याच प्रकरणात तपास करून 8 मार्च रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरासह अनिल परब यांचे लेखापरीक्षक (सीए) असलेल्या व्ही. एस. परब असोसिएटस आणि निकटवर्तीय संजय कदम यांच्या अंधेरीतील कैलास नगरमध्ये असलेल्या स्वॅन लेक या इमारतीतील घरी, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घर आणि मालमत्ता अशा तब्बल 26 हून अधिक ठिकाणी छापे टाकले.

प्राप्तिकर खात्याने कदम आणि परब असोसिएटवरील छापेमारीत, दापोली येथील रिसॉर्टसाठी 2017 साली 1 कोटीच्या मोबदल्यात जमीन खरेदी करण्यात आली. पुढे या 1 कोटीच्या जमीन व्यवहाराची नोंद 2019 मध्ये करण्यात आली. 2017 ते 2020 या काळात येथे तब्बल 06 कोटी रुपये खर्च करून एक मोठे आलिशान रिसॉर्ट बनवले गेले. अनिल परब यांच्या नावाने झालेली ही जमीन रिसॉर्ट पूर्ण झाल्यावर मुंबईतील केबल व्यावसायिक संजय कदम यांना विकण्यात आली. परंतु, यात फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याचे तपासात समोर आल्याने अनिल परब हे प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आले.

पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घर आणि मालमत्तांवर छापेमारी करत प्राप्तिकर खात्याच्या अधिकार्‍यांनी केलेल्या तपासात खरमाटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइकांनी मागील 10 वर्षांच्या काळात पुणे, सांगली आणि बारामती येथे मोक्याच्या ठिकाणी मालमत्तांच्या स्वरूपात प्रचंड संपत्ती खरेदी केल्याचे उघड झाले आहे. खरमाटे यांच्या कुटुंबाकडे पुण्यात एक बंगला आणि एक फार्म हाऊस, तासगावमध्ये एक भव्य फार्म हाऊस, सांगलीत दोन बंगले, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे शोरूम, तनिष्क आणि कॅरट या नामांकित ब्रँडची शोरूम आहेत.

पुण्यातील विविध ठिकाणी पाच फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, मोकळे भूखंड, सांगली, बारामती आणि पुणे येथे गेल्या 7 वर्षांत 100 एकरहून अधिक शेतजमीन खरमाटेंनी खरेदी केली आहे. दुकाने, फ्लॅट आणि बंगल्यांच्या अंतर्गत भव्य सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. वापरण्यात आलेल्या पैशांचा स्रोत याबाबत तपशीलवार चौकशी प्राप्तिकर खात्याकडून सुरू आहे.

सरकारी कर्मचार्‍याच्या नातेवाइकांकडून चालवल्या जाणार्‍या बांधकाम व्यवसायाला राज्य सरकारकडून अनेक कंत्राटे देण्यात आली आहेत. तसेच बोगस खरेदी आणि बोगस उप-करारांच्या माध्यमातून कराराच्या खर्चात वाढ झाल्याचा पुरावेही प्राप्तिकर खात्याला झाडाझडतीमध्ये सापडले होते. बनावट कंत्राटांच्या माध्यमातून 27 करोड रुपये मिळविल्याची बिले आणि बारामती परिसरातील जमीन खरेदीच्या 2 करोड रुपयांच्या मिळालेल्या पावत्यांच्या आधारे बांधकाम व्यवसायातील करचुकवेगिरीबाबतही प्राप्तिकर खाते तपास करत आहे.

प्राप्तिकर खात्याने या कारवाईमध्ये मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित रिसॉर्ट आणि आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे याच्या मालमत्तेची महत्त्वपूर्ण माहिती कागदपत्रे, मालमत्तेच्या व्यवहारांच्या माहितीसह 66 लाख रुपयांची रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे, डिजिटल डेटा प्राप्तिकर खात्याने जप्त केला होता. हा ऐवज पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. तेव्हाच परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. ती गुरुवारी खरी ठरली.

वाझे प्रकरणातही नाव

मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने गृहविभागातील बदल्यांच्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच पोलीस उपायुक्तांमार्फत जमा केलेल्या 40 कोटी रुपयांपैकी 20 कोटी रुपये अनिल परब यांना बदल्या थांबवण्यासाठी मिळाले होते आणि अनिल देशमुख यांना 20 कोटी हे त्यांच्या स्वीय्य सहाय्यकाच्या मार्फत देण्यात आल्याचा आरोप वाझेने केला आहे. मात्र, गुरुवारची चौकशी ही फक्‍त दापोलीच्या रिसॉर्टबद्दल झाल्याचे सांगण्यात येते. म्हणजे अजून वाझे प्रकरण बाकीच आहे.

ईडीकडून सुटका होताच वर्षा गाठले

अनिल परब यांनी ईडीच्या दिवसभर सुरू असलेल्या चौकशीतून सुटका होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर भेट घेतली. या भेटीत त्यांनी ईडीने केलेल्या चौकशीचा तपशील मुख्यमंत्र्यांच्या कानी घातला. चौकशीत ईडीचा भर कशावर होता. कोणते प्रश्न विचारण्यात आले याची माहितीही परब यांनी दिली. तसेच ईडीने आज सुटका केली असली तरी अटकेच्या कारवाईची टांगती तलवार मात्र परब यांच्यावर कायम आहे. त्यामुळे त्याला कसे तोंड द्यायचे यावरही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण पक्ष तुमच्या सोबत आहे, असा विश्वास परब यांना दिला.

Back to top button