चंद्रकांत पाटील म्हणाले, "उद्धवजी, कधीतरी बंड करून उठा" | पुढारी

चंद्रकांत पाटील म्हणाले, "उद्धवजी, कधीतरी बंड करून उठा"

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे न्यायालयाने मान्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात वाद-प्रतिवाद केले जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मलिकांचा अजून राजीनामा का घेण्यात आला नाही”, असाही प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात आहे. (Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात जे चाललंय त्याबद्दल हसावं की रडावं असा प्रश्न पडतोय. नवाब मलिकांचा मुंबईतल्या बॉम्बस्फोटात सहभागी गुन्हेगारांशी असलेला संबंध याविषयी त्यांना अटक करून चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. सुरुवातीला त्यांची खाती काढून घ्यायला मुख्यमंत्री तयार नाहीत. नंतर लक्षात आलं की खाती ठेवली तर फायली सहीला तुरुंगात पाठवायला लागतील. त्यामुळे नाईलाजाने खाती काढली. पण अजून मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. न्यायालयाने दाऊदशी संबंध असल्याच्या दाव्यात तथ्य असल्याचं म्हटल्यानंतरही नवाब मलिकांचा राजीनामा उद्धव ठाकरे घेणार नसतील, तर महाराष्ट्राची इतर कोणत्या राज्याशी तुलना करणं ही त्या राज्यावर अन्याय होईल”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. (Chandrakant Patil)

“कुणीतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, तर त्यावर तातडीने १५-१६ जिल्ह्यांत केसेस दाखल होतात. अटक होते. जामीन मिळू दिला जात नाही. मग ज्यांचा हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी संबंध असल्याचं न्यायालयाने म्हटल्यानंतरही राजीनामा घेणार नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की पवारांशी प्रेरित शिवसेना आहे. पवार बोले, शिवसेना चाले अशी सध्या स्थिती आली आहे. केवळ आपल्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी बंड करून उठा. महाराष्ट्राची काही अस्मिता आहे. बाळासाहेबांचा वारसा शिल्लक ठेवायचा आहे की नाही? की ते संग्रहालयात ठेवायचे आहेत?”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली.

पहा व्हिडीओ : लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त कृतज्ञता सभा

Back to top button