देवेंद्र फडणवीस, “विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी कुभांड रचले गेले” | पुढारी

देवेंद्र फडणवीस, "विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी कुभांड रचले गेले"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकण्यासाठी पोलीस आणि सरकारी वकिलांनी कट रचला. धाडी टाकणाऱ्यांना विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आदेश दिले. त्यासाठी खोटे पंच, खोटे साक्षीदार उभे करण्यात आले”, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

“गिरीश महाजन, संजय कुटे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मला अडचणीत आणण्यासाठी कट रचण्यात आले. त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सगळे आदेश दिले. धाडी कशा टाकायच्या, चाकू कसे ठेवायचे, मोक्का कसा लावायचा, यासंदर्भात सगळ्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. सरकारच्या मदतीने हे कारस्थान शिजले”, असे धक्कादायक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस पुढे म्हणाले की, “खोट्या तक्रारी करून खोटे साक्षीदार उभे करून विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी कुभांड रचले गेले. विशेष सरकारी वकिलाच्या कार्यालयात विरोधकांच्या विरोधात कट शिजवण्यात आला. या प्रकरणात एफआयआर सरकारी वकिलांनीच लिहून दिला आणि साक्षीदारही दिला. या सगळ्या संभाषणांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. तब्बल सव्वाशे तासांचे फुटेज आहे. त्यावर २५ ते ३० भागांची वेब सीरिज निघेल आणि हे सगळं सत्य घटनेवर आधारित आहे”, असाही दावा फडणवीसांनी केला.

“विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्याने याची चौकशी सीबीआयकडून व्हायला हवी”, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. “म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो असं आपण म्हणतो. ती परिस्थिती या सरकारमध्ये पाहायला मिळतेय”, असंही फडणवीस म्हणाले.

Back to top button