Pravin Darekar : ‘शिवसेनेचा सिनेमा येण्यापूर्वी तो ट्रेलरमध्येच फ्लॉप’ | पुढारी

Pravin Darekar : 'शिवसेनेचा सिनेमा येण्यापूर्वी तो ट्रेलरमध्येच फ्लॉप'

मुंबई, पुढारी ऑनलाईन : ‘शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परीषद म्हणजे फुसका बार आहे. त्यांनी निव्वळ ड्रामा केला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले त्यांना मानसोपचाराची गरज आहे,’ असल्याची खोचक टीप्पणी भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली. राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर लाड यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते बोलत होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा पलटवार…

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही राऊत यांच्या पत्रकार परिषदेवरून प्रतिक्रिया दिली. राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे फुसक्याहून फुसका बार असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपमधील साडेतीन लोकांची नावे राऊतांनी घेतली नाही. इव्हेंट करुन काहीतरी माठे करायचे परंतु त्यांचा तो प्लान फसला असल्याचे दरेकरांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी करायची असते. सत्ताधाऱ्यांनी कारवाई करायची असते महाविकास आघाडी सरकार बसलेले आहे. सरकार बसवण्यात सर्वात मोठा रोल संजय राऊतांचा आहे. त्यामुळे संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना सांगितले तर कारवाई होते मग मोहित कंबोज यांच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी तक्रार केली पाहिजे. परंतु यांना तक्रारीमध्ये जायचे नाही. शिवसेनेचा सिनेमा येण्यापूर्वी ट्रेलरमध्येच तो फ्लॉप झाला आहे, असे म्हणत दरेकर यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (दि.१५) मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. भाजपचे लोक मला तीनवेळा भेटले. त्यांनी वारंवार मला सांगितले की तुम्ही मधे पडू नका. आमचे सरकार येण्यासाठी मदत करा. जर तुम्ही लोकांनी मदत केली नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला ‘टाईट’ करतील, अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. महाविकास आघाडेचे सरकार पडणार नाही हे जेव्हा मी त्यांना ठकावून सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर ईडीच्या धाडी पडल्या. तिहार जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या, असा दावा त्यांनी केला.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायचे आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. एकतरी तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार घालवू, अशी धमक्या दिल्या जात आहेत. पण आम्ही झुकणार नाही. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही, मराठी माणूस बेईमानी नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

Back to top button