फडणवीसांकडून शिवसेना संपविण्याचे राजकारण
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांच्या इशार्यावरून शिवसेना संपविण्याचे राजकारण केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
पाच वर्षांच्या निकालावरून भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले असल्याचे स्पष्ट होते, असे सांगून मलिक म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे युतीत सडलो, असे विधान केले आहे. मात्र, आता पालिकांच्या निकालावरून सेनेचा ग्राफ महाविकास आघाडीमुळे कितीतरी पटीने वाढलेला दिसत आहे.
भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो, त्यांचे खच्चीकरण करतो हे कळल्यामुळे शिवसेनेने भाजपला बाजूला केले. सेना सोबत असताना भाजप मोठी झाली हे आता फडणवीस यांना समजले आहे. परंतु, आठ वर्षांपासून ते सेनेला संपविण्याचे राजकारण करत होते, असा पुनरुच्चारही मलिक यांनी केला.