जालना; पुढारी वृत्तसेवा : लातूर येथील रेल्वे कोच प्रकल्पातून आगामी 11 ते 12 महिन्यात 'वंदे भारत' रेल्वे कोचचे उत्पादन केले जाणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली.
जालना येथे रेल्वेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या कोच देखभाल व सुविधांच्या (पीटलाईन) पायाभरणीचा शुभारंभ वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वैष्णव म्हणाले की, पूर्वी आधुनिक रेल्वे विदेशातून आयात केल्या जात होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक व वेगवान रेल्वे देशातच तयार करण्याचा निर्धार केला. त्यानंतर वंदे भारत रेल्वेचे स्वप्न साकारले. आता भारतात तयार झालेल्या रेल्वे परदेशात निर्यात होणार आहेत. लातूर येथील रेल्वे प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही होईल.
रुफ प्लाझा तयार करणार देशात अनेक ठिकाणी रेल्वेस्थानके मध्यवस्तीत आल्याने लोकांना रुळ ओलांडताना अडचणी येतात. त्यामुळे भविष्यात रुफ प्लाझा तयार केले जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून आगामी काळात सुसज्ज रेल्वेस्थानके बनविण्यात येणार आहेत. रेल्वे स्टेशनवर विविध स्टॉलसह लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची व्यवस्था राहणार आहे. स्थानकावरील स्टॅाल्समुळे बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार मानले. लातूरला मोठी विकासात्मक भेट मिळत असल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आपण विशेष आभार मानतो, असेही निलंगेकर यांनी सांगितले.