केमिकल युक्त पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या फळबाग, खरीप पिकांचे नुकसान

केमिकल युक्त पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या फळबाग, खरीप पिकांचे नुकसान
केमिकल युक्त पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या फळबाग, खरीप पिकांचे नुकसान
Published on
Updated on

बिडकीन (जि. औरंगाबाद) : शुभम शेळके

पैठण तालुक्यातील धनगाव येथील एका कंपनीने सांडपाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. या कंपनीचे केमिकल युक्त पाणी कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांची जमीन बाधीत होवून फळबाग व खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची ओरडही शेतकरी करत आहेत. यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना बाधीत शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देवून या केमिकल युक्त पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी केली आहे.

धनगाव येथील एका कंपनीच्या आवारातील भिंती लगत असलेल्या तळ्यामध्ये केमिकल युक्त पाणी साचलेले होते. त्यात सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पाण्याची भर पडल्याने हे पाणी आजुबाजुच्या शेतात गेले. त्यामुळे फळबागा व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. मागील वर्षीही फळबाग व खरीप हंगामातील पिकांचे अशाचप्रकारे नुकसान झाले होते. एवढेच नाही तर काही क्षेत्र या पाण्यामुळे पडीक ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. कंपनीच्या व्यवस्थापनाला तेथील पाण्याची विल्हेवाट करण्यासंदर्भात वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या, पण त्यांनी शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. केमिकल युक्त पाण्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

केमिकल युक्त पाणी शेतात गेल्याने कंपनीच्या शेजारील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याप्रकरणी दि. ७ ऑक्टोबर रोजी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी बाधीत शेतकऱ्यांसह या नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तहसिलदार यांना निवेदनासह त्या पंचनाम्याचा अहवालही देण्यात आला. येत्या आठ दिवसांत बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून केमिकल युक्त सांडपाण्याचे नियोजन करावे असे शेतक-यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या समस्येवर तोडगा काढला नाहीतर ग्रामपंचायत सह बाधीत शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीत जाणारा रस्ता अडविण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच मिराबाई कातबणे, उपसरपंच योगेश बोबडे, दत्तात्रय इमले, संजय इमले, ज्ञानेश्वर महाले, विकास नाचण, रावसाहेब बोबडे, बापुसाहेब कातबणेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पारंपरिक ओढ्यावर भराव टाकून 'त्या' कंपनीने रोड केला. बाजूला चऱ्या पण केल्या नाही. त्यामुळे जवळपास ३० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तरी कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई व कंपनी दूषित सांडपाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा ८ दिवसानंतर सर्व शेतकरी रस्ता बंद करतील.
– यज्ञेश वसंतराव कातबने, शेतकरी

कंपनी प्रशासनाला वेळोवेळी दूषित पाण्याविषयी समज दिली, परंतु त्याचा कुठला उपयोग झाला नाही. ग्रामपंचायतीने त्याबद्दल अहवाल तहसील कार्यालयाला दिला आहे. आज मोठ्या प्रमाणात शेतीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. या कंपनीमुळे वन्यजीव प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी उद्रेक करतील. त्याला संपूर्णपणे कंपनी जबाबदार असेल.
– योगेश बोबडे, उपसरपंच, (ग्रामपंचायत, धनगाव)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news