उस्मानाबाद: तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू

उस्मानाबाद: तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू
Published on
Updated on

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन प्रथम वर्ष आणि बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी थेट व्दितीय वर्षे तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर हमखास यशाचा मार्ग म्हणून या शाखेकडे पहिले जाते. विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.

दहावीच्या गुणांवरतंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्षास आणि बारावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट व्दितीय वर्षास प्रवेश दिला जातो. त्यामुळे कमी कालावधीमध्ये एक उत्तम करिअर निर्माण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. तंत्रनिकेतन मधील व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय सुरु करता येतो. रेल्वे, संरक्षण दले, आरटीओ, भेल, महावितरण, दूरसंचार विभाग, पाटबंधारे विभाग, तंत्रशिक्षण विभाग आदी सरकारी, निमसरकारी क्षेत्राबरोबरच वाढत्या औद्योगिकीकरणाच्या आधुनिक काळात तंत्रनिकेतनमधून उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना खाजगी उद्योगक्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

तसेच बी. टेक, बी.ई.,बी.ऑर्कीटेक्चर, बी. एस्सी व्होकेशनल, बीबीए अशा आणि इतर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासही विद्यार्थी पात्र ठरतो. अंतिम वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांना परिसर मुलाखती मधून विविध नामांकित कंपन्यातर्फे नोकरीची संधी दिली जाते.

मागील वर्षी मराठवाडयातील ग्रामीण आणि शहरी भागातील जवळपास 1130 विद्यार्थ्यांची निवड परिसर मुलाखती मार्फत झाली आहे. अशी माहिती औरंगाबाद येथील तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी दिली आहे. या वर्षीची तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना ई-स्क्रुटीनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटीनी पैंकी एका सुविधेचा पर्याय निवडून अर्ज भरता येईल. औरंगाबाद विभागात शहरी आणि ग्रामीण भागात 50 प्रवेश सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याठिकाणी विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

औरंगाबाद विभागात शासकीय आणि अशासकीय अशी एकूण 57 तंत्रनिकेतने आहेत. त्यांची 15 हजार 40 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमातील असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा आणि अध्ययन अध्यापनासाठी मराठी माध्यमाचाही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून नियमात केलेल्या बदलानुसार कोणत्याही शाखेतून आयटीआय उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा तंत्रनिकेतनमधील थेट द्वितीय वर्षाच्या सर्व शाखांसाठी पात्र राहील.

विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तिसर्‍या अतिरिक्त प्रवेश फेरीचा अंतर्भाव या वर्षीपासून प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला आहे. कोव्हिडमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील गमावले आहेत आणि ज्यांच्याकडे पीएम केअर्स प्रमाणपत्र आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन अतिरिक्त जागा अभ्यासक्रम निहाय राखीव ठेवण्यात आल्या आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news