जालना; पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी गावातील लोकांच्या केसाला जरी धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र येथे उभा करेन, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. पोलिसांनी कोणाच्या आदेशाने हे कृत्य केले, त्याचाही तपास झाला पाहिजे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे तशीच ती वीरांचीदेखील भूमी आहे, हे राज्यकर्त्यांनी विसरू नये, त्यांच्यासोबत पंगा घेऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटत आहेत. त्यानंतर ठाकरे यांनी शनिवारी रात्री त्या आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार संजय राऊत आदी नेत्यांची उपस्थिती होती.
आंदोलकांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या मागण्या आज उगवल्या असे नाही. तुमच्या समाजाचा भावनेचा आदर करून आम्ही काम करत होतो. तेव्हाही लढा सुरू होता. अगदी आझाद मैदानात उपोषण झाले असता लाठ्याकाठ्या उगारल्या गेल्या नव्हत्या. तसेच त्या उगारू दिल्या नव्हत्या.