परभणी: पुढारी वृत्तसेवा – परभणी जिल्ह्यामध्ये विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना आठ दिवस दिवसा तर, आठ दिवस रात्री वीज मिळत आहे, असे भारनियमन अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे केले आहे, या प्रश्नाचे उत्तर महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील गंभीर बनवलेल्या विजेच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे, अशी मागणी माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
परभणी जिल्ह्यातील विजेचा प्रश्न सोडवायचा असेल, त्यासाठी जिल्ह्यात १ – २२० केव्ही, २ – १३२ केव्ही व साधारणपणे २० – ३३ केव्ही लिंक लाईन करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विजेसंबंधीची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे, अशी माहिती लोणीकर यांनी पत्राद्वारे फडणवीस यांना दिली आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन ऊर्जामंत्री व विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यात २ – २२० केव्ही, १ – १३२केव्ही व ४९ – ३३ केव्ही लिंक लाईन मंजूर केली होती. त्यामुळे आज जालना जिल्ह्यातील विजेची परिस्थिती अत्यंत चांगली असून, त्याबाबत शेतकरी समाधानी आहेत. त्याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार करून लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी लोणीकर यांनी केली आहे.
हेही वाचलंत का ?