जिंतूर : तालुक्यातील असोला येथील एका युवकाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने स्वतः च्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सोमवारी (दि.१४) सायंकाळी उशिरा घडली. या प्रकरणी मंगळवारी बामणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष उद्धवराव नेवरे (वय ३८) असे त्या युवकाचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. त्यासाठी सातत्याने उपोषण आंदोलने केली असली तरी सरकार मराठ्यांना न्याय देत नसल्याने अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना असोला येथील संतोष उद्धवराव नेवरे या युवकाच्या बाबतीत घडली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या विवंचनेतून त्याने मंगळवारी सायंकाळी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेवून जीवन संपवले. ही बाब त्याचा लहान भाऊ परमेश्वर नेवरे याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने वामणी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत संतोष नेवरे याचे जिंतूर येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन केले. संतोष यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडिल, बहीण, भाऊ असा परिवार आहे.