

Rural areas plunged into darkness due to night-time load shedding; Citizens are angry
परभणी, पुढारी वृत्तसेवा बोरी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सध्या सुरू असलेले रात्रीचे भारनियमन नागरिकांच्या जीवितासह विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरही परिणाम करणारे ठरत असल्याने हे भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे, अशी जोरदार मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समिती सदस्य माणिक शेषराव हारकळ यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे बोरी परिसरातील वीजप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हारकळ यांनी निवेदनात नमूद केले की, बोरी उपकेंद्रांतर्गत करवली, पिंपरी रोहिला, कसर, कोक, माक, शेक, वाघी (बो.), जवळा, गणपूर आणि कौसडी सर्कलमधील अनेक गावांमध्ये दररोज रात्री 7 ते 10 या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. नेमकी हीच वेळ नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाची, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची आणि शेतकऱ्यांच्या विविध कामांची असल्याने या भारनियमनाचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
सध्या पावसाळा सुरू असून साप, विंचू व इतर विषारी प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण गाव अंधारात बुडाल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडताना, रुग्णांना उपचारासाठी ने-आण करताना तसेच महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.