कौसडी, पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्ह्यासह कौसडी परिसरात आज (दि.२७) पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे पिके आडवी झाली आहेत.
यामध्ये जिंतूर तालुक्यातील कौसडी, मारवाडी, मंगरूळ तांडा, पिंपळगाव गायके तर सेलू तालुक्यातील भांगापूर, चिमणगाव, हटा, कुपटा, गुळखंड, गव्हा, आडगाव दराडे, तांदूळवाडी, कान्हड येथे कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, गहू, हळद तर बागायतदार शेतकऱ्यांचे केळी, मोसंबी, लिंबू, आवळा, चिकू यासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ज्वारी व तूर जमिनीवर आडवी पडली आहे. मागच्या पावसाळ्यात पाऊस फार कमी झाल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली होती. शेतकऱ्यांना तूर व कापूस तसेच हरभरा, ज्वारी, गहू या पिकांमध्ये उत्पन्न चांगले निघेल, अशी आशा होती. परंतु, पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले आहे. शासनाने सर्व पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
हेही वाचा