

Parbhani Purna ZP Election 2026
आनंदा ढोणे
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर, चुडावा, कावलगाव, गौर, ताडकळस आणि वझूर या सहा जिल्हा परिषद गटांसह त्यातील एरंडेश्वर, आहेरवाडी, चुडावा, देगाव, कावलगाव, धानोरा मो., गौर, ध टाकळी, ताडकळस, फुलकळस, वझूर व देऊळगाव दुधाटे या बारा पंचायत समिती गणांसाठी शनिवारी (दि. ७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या मतदानासाठी एकूण १४२ मतदान केंद्रांवर वापरण्यात येणारी ईव्हीएम (कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट) यंत्रे शुक्रवारी तहसील कार्यालयातून आवश्यक चाचणीनंतर रवाना करण्यात आली. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून, संपूर्ण तालुक्यासाठी १२ झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, पूर्णा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांमध्ये काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिहेरी अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
एरंडेश्वर जिल्हा परिषद गटात भाजपच्या डॉ. स्मिता कदम, उबाठा शिवसेनेचे रितेश काळे व काँग्रेसचे नारायण चापके यांच्यात तिहेरी लढत होत आहे.
ताडकळस गटात उबाठा शिवसेनेच्या केशरबाई जल्हारे, राष्ट्रवादीचे सुरेश मगरे, भाजपचे केदार स्वामी, शिंदे गटाचे रामलिंग स्वामी यांच्यासह एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत.
चुडावा गटात भाजपचे भरत घनदाट, उबाठा शिवसेनेचे गोरखनाथ भालेराव, राष्ट्रवादीचे अशोक धुतराज तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये लढत आहे.
कावलगाव गटात भाजपच्या उज्ज्वला नागेश्वर व अपक्ष अर्चना ढगे यांच्यात थेट दुहेरी लढत आहे.
गौर गटात राष्ट्रवादीच्या कोमल पारवे, यशवंत सेनेच्या गयाबाई माठे, भाजपच्या शीतल खटिंग यांच्यात प्रमुख तिहेरी लढत होत आहे.
वझूर गटात भाजपच्या उर्मिला बनसोडे व उबाठा शिवसेनेच्या बेबीताई कुकर यांच्यात मुख्य दुहेरी लढत आहे.
पंचायत समिती गणांमध्येही चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. एरंडेश्वर गणात उबाठाच्या कान्हूपात्रा चापके व भाजपच्या कोमल काळे यांच्यात दुहेरी लढत आहे.
आहेरवाडी येथे भाजपच्या शकुंतला बोबडे व उबाठाच्या शोभा मोरे आमनेसामने आहेत.
चुडावा गणात भाजपच्या प्रियांका गच्चे, राष्ट्रवादीच्या शीला सदावर्ते व उबाठाच्या पूर्णिमा कापूरे यांच्यात तिहेरी लढत आहे.
देगाव, धानोरा मो., गौर, ध टाकळी व वझूर या गणांमध्येही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत.
दरम्यान, या निवडणुकीसाठी मागील आठ दिवसांपासून प्रमुख राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी लाखो तर काही ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीला पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, खासदार संजय जाधव व आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी प्रतिष्ठेची बनवली असून प्रचारादरम्यान परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अशा परिस्थितीत मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याचे उत्तर ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.