

Pangra Road Work Controversy
पूर्णा : तालुक्यातील पांगरा रस्त्यावर सुरू असलेले मजबुतीकरणाचे काम संबंधित गुत्तेदाराने अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर ठिकठिकाणी मोकळी गिट्टी पसरलेली असून, त्यावरून वाहनांची ये-जा करणे धोकादायक बनले आहे. दुचाकी व चारचाकी वाहने घसरून अपघात होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे १९ डिसेंबर रोजी पांगरा येथे विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आले असता, सरपंच उत्तमराव ढोणे यांनी रस्त्यावरील गिट्टीवर तातडीने मुरूम टाकून दबई फिरवण्याच्या सूचना संबंधित गुत्तेदाराला देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आमदार गुट्टे यांनी कार्यक्रमस्थळीच रस्त्याचे काम घेणारे गुत्तेदार देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मुरूम टाकण्यास सांगितले. त्या वेळी गुत्तेदाराने काम करून घेण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, तब्बल दहा दिवस उलटूनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी रस्त्यावरील गिट्टी जशीच्या तशी असून पादचारी तसेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमदारांची स्पष्ट सूचना असूनही गुत्तेदाराने ती धुडकावून लावल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित गुत्तेदाराची मनमानी एवढ्या टोकाला गेली आहे की, कोणाच्याही सूचनांना तो जुमानत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या पार्श्वभूमीवर २६ डिसेंबर रोजी आमदारांचे स्वीय सहाय्यक पवार यांनीही ग्रामस्थांच्या विनंतीवरून पुन्हा एकदा गुत्तेदाराशी संपर्क साधून मुरूम टाकून समस्या सोडवण्यास सांगितले. तरीसुद्धा गुत्तेदाराकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. उलट रस्ता मजबुतीकरणाचे अपूर्ण काम तसेच सोडून संबंधित यंत्रसामग्री अन्यत्र हलवून गुत्तेदार नामानिराळा झाल्याचे दिसून येत आहे.
रस्ता उखडलेल्या अवस्थेत असल्याने दररोज दुचाकी घसरून प्रवासी पडत आहेत. रस्त्यावर पसरलेल्या मोकळ्या गिट्टीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी पूर्णा–पांगरा मार्गावर हिवरा गाव नदी हद्दीपर्यंत सुमारे ९ किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर होऊन ते लातूर येथील आशिर्वाद कन्स्ट्रक्शनला देण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्षात रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाऐवजी काम अर्धवट सोडून दिल्याने पांगरा, पिंपळा लोखंडे, मरसूळ, धार, वाई आणि हिवरा येथील प्रवासी व नागरिक गिट्टीमय रस्त्याला वैतागून गेले आहेत. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन गुत्तेदारावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.