

Parbhani Political MLA Rajesh Vitekar election
परभणी, पुढारी वृत्तसेवा :
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, राज्यस्तरावरून सदर निवडणुका एकत्रित लढण्यात याव्यात अशा सूचना आहेत, परंतु काही स्थानिक कारणाने असमन्वय झालाच तर स्वतंत्र लढायची गरज पडल्यास आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचीही तयारी असू द्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राजेश विटेकर म्हणाले.
परभणी येथील एमआयडीसी परिसरातील मंगल कार्यालयात शनिवारी (दि.७) झालेल्या पक्षाच्या संवाद व संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते. २०१४ प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांशी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगर पालिका या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात होत्या. आता पुन्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बाजूंनी एक नंबरवर असल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे असेही ते म्हणाले.
जे कार्यकर्ते, पदाधिकारी हे पक्ष कार्य करतील व आपापल्या भागात पक्ष एक नंबरवर आणतील त्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हास्तरीय अशासकीय समित्यांवर पदे दिली जातील. आपापल्या गाव, सर्कल व वॉर्ड विकासासाठी निधी मागण्यासाठी अनेकजण येऊन भेटत आहेत. त्या सर्वांचे पक्षकार्य, सदस्य नोंदणी व लोकांसाठी त्यांनी केलेली कामे लक्षात घेऊनच निधी वाटपाबाबत पुढील दिशा ठरविण्यात येईल, ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे रहायचे अशांनी आजपासूनच सर्व शक्तिनिशी तयारी करावी, असेही आ. विटेकर म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या तर अडीच वर्षांनी होणाऱ्या मंत्रीमंडळ बदलात आ.राजेश विटेकर यांना मंत्रीपद मागण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अभिमानाने जाता येईल व हक्कानी मंत्रीपद मागता येईल असे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी म्हटले, यावेळी चंद्रकांत राठोड, एकनाथ साळवे, नानासाहेब राऊत, भावनाताई नखाते, प्रताप देशमुख यांनी पक्ष वाढीसाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्यांनाच पदे व निधी द्या असे मनोगत व्यक्त केले. बैठकीस मराठवाडा समन्वयक आ. विक्रम काळे यांनी मोबाईलवरून मनोगत मांडले. दि.१० जून रोजी बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास, दादासाहेब टेंगेसे, अनिल नखाते, भावनाताई नखाते, वसंत शिरसकर, नंदाताई राठोड, लक्ष्मीकांत देशमुख, दत्ता जाधव, संजय कदम, पंकज आंबेगावकर, माधवराव भोसले, दसरथ सूर्यवंशी, किरण तळेकर, रोहन सामाले, सुनील गोळेगावकर, अक्षय देशमुख, जयश्रीताई खोबे, माधवराव जोगदंड, अप्पासाहेब पवार, पी.आर.जाधव, रामेश्वर आवरगंड यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास दोन ते अडीच हजार प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, माजी जि.प. व पं.स.सदस्य उपस्थित होते.