

मानवत : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने मारलेल्या ओढीमुळे तालुक्यात पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना तातडीने अर्थसाहाय्य आणि पीक विमा भरपाई मिळवून देण्याच्या मागण्यांचे निवेदन केकरजवळा महसूल मंडळातर्फे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील केकरजवळा महसूल मंडळात मान्सूनच्या काळात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८२.५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली. जून ते ऑगस्ट दरम्यान केवळ ८९.८३ मि.मी. पाऊस पडला. सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव व येलो मोझॅक रोगाचे संकट ओढावले असून उत्पन्नात ४० ते ५० टक्के घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पीक विमा २०२६ च्या शासन निर्णयानुसार उपग्रह पाहणीची अट शिथिल करून जुन्या ४ निकषांनुसार भरपाई मंजूर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर ज्ञानेश्वर धोपटे, रितेश कदम, विष्णू हारके, गजानन लाडाने, अनिल चौधरी, विनायक वरखडे, योगेश धोपटे, नागेश आळसे, मारोतराव आरसूल, गणेश कौसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.