

Parbhani News: District Bank Election: 98.21 percent voting
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार, कृषी पतपुरवठा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि राजकीय नेतृत्वाचे शक्तिकेंद्र मानली जाते. त्यामुळे या बँकेवरील सत्ता म्हणजे ग्रामीण राजकारणातील प्रभावाचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांतील मंत्र्यांसह आजी-माजी आमदार, खासदार, माजी मंत्री आणि प्रभावशाली
परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीने यंदा केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण परभणी हिंगोलीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू गाठला आहे. रविवारी (दि. १९) १४ केंद्रांवर झालेल्या मतदानात १,५०८ मतदारांपैकी तब्बल १,४८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ९८.२१ टक्के विक्रमी मतदानाची नोंद केली. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दिवसभर दिसलेली चुरस पाहता या निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले असून, सोमवारी (दि. २०) होणाऱ्या मतमोजणीत सहकाराच्या सत्तेचा ताज कोणाच्या डोक्यावर चढणार याचा फैसला होणार आहे.
नेत्यांनी आपापली संपूर्ण ताकद पणाला लावली. प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत गावोगावी बैठका, मतदारांच्या भेटीगाठी, गटबाजी आणि राजकीय रणनीतींचा जोर कायम होता. बँकेच्या २१ संचालक पदांपैकी १३ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. या बिनविरोध संचालकांमध्ये पालकमंत्र्यांसह आजी-माजी आमदार व अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याने उर्वरित ८ जागांवरील निवडणूक ही प्रत्यक्षात प्रतिष्ठा, वर्चस्व आणि भविष्यातील राजकीय समीकरणांची लढाई ठरली आहे.
या निकालावर अनेक राजकीय गटांचे अस्तित्व, प्रभाव आणि भविष्यातील नेतृत्वाची दिशा अवलंबून असल्याचे मानले जात आहे. हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांमध्ये विस्तारलेल्या बँकेमुळे उमेदवारांना प्रचारासाठी मोठी धावपळ करावी लागली. अनेकांनी मतदारांशी थेट संपर्क साधत गाठीभेटी घेतल्या, तर काही मतदारसंघांत मतदारांना सहलीवर नेल्याच्या चर्चांनीही राजकीय वातावरण चांगलेच तापविले. मतदानाच्या दिवशीही अनेक केंद्रांवर उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली.
दिवसभर राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत होते. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान शांततेत पार पडले. मानवत, सोनपेठ आणि गंगाखेड येथे १०० टक्के मतदान झाले, तर परभणीमध्ये ९८.७७ टक्के, सेलू ९८.८१ टक्के, पूर्णा ९८.२१ टक्के, हिंगोली ९८.४३ टक्के, वसमत ९९.२० टक्के, पालम व औंढा ९६.३४ टक्के, जिंतूर ९५.६५ टक्के आणि पाथरी २१.८४ टक्के मतदानाची नोंद झाली. जवळपास प्रत्येक केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने मतदारांनी या निवडणुकीला अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले.
या निवडणुकीत तालुका मतदारसंघांसह विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि इतर शेती संस्था या मतदारसंघांतील प्रतिनिधींनी मतदान केले. ग्रामीण भागातील सहकार संस्थांवर प्रभाव असलेल्या या मतदारसंघांमुळे निकालाचे राजकीय परिणाम अधिक व्यापक असतील, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, काही मतदारसंघांत अत्यंत अटीतटीची लढत झाल्याने धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली. विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील काही जागांवर प्रस्थापित नेतृत्वाला आव्हान मिळाल्याची चर्चा असून, मतमोजणीनंतर अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ
सहकार संस्थेपुरती न राहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांची रंगीत तालीम ठरत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सु. पं. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणुक निर्णय अधिकारी एम.यु.यादव, बी. एस. नांदापूरकर यांनी संपूर्ण मतदान प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांसह कर्मचारी नियुक्त होते, तर प्रत्येक ३ केंद्रांमागे झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले.
जिल्हा बँकेसाठी सोमवारी (दि. २०) सकाळी ८ वाजल्यापासून परभणी येथील कल्याण मंडपम्, जायकवाडी परिसर, कारेगाव रोड येथे मतमोजणी होणार असून, सहकार क्षेत्रातील सत्तेची अंतिम लढाई तेथे रंगणार आहे. या निकालानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेवर कोणाचा झेंडा फडकणार, कोणत्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित होणार, कोणत्या दिग्गजांच्या राजकीय प्रतिष्ठेला तडा जाणार आणि कोणाचा राजकीय दबदबा अधिक मजबूत होणार, याकडे संपूर्ण परभणी व हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सहकाराच्या या रणांगणातील निकाल केवळ संचालकांची नावे निश्चित करणार नाही, तर पुढील काही वर्षांसाठी जिल्ह्याच्या राजकीय सत्तासमीकरणांची दिशाही ठरविणारा ठरणार आहे.