

परभणी : शहर महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल यांनी बुधवारी (दि.१८) बी. रघुनाथ सभागृहात असलेल्या मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाला मास्क लावून भेट तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. मनपाचा जन्म-मृत्यू नोंदणी विभाग हा दलालांचा अड्डा बनला असून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरीकांना दोन-दोन, तीन-तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांची फरपट होत असताना येथे दलालखोरांकडून मात्र चिरिमिरी घेऊन नागरिकांची कामे केल्या जात आहेत.
परभणी शहर मनपाच्या नवनिर्वाचित महापौरपदी सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर महापौर सय्यद इकबाल अॅक्शन मोडवर आले आहेत. परभणी मनपाचा जन्म-मृत्यू नोंदणी विभाग म्हणजे अक्षरशः दलालांचा अड्डा बनला असून या कार्यालयाचे आपण अनेक दिवसांपासून निरीक्षण करत असल्याचे महापौर इकबाल यांनी स्पष्ट केले.
कार्यालयामध्ये मोठया प्रमाणात महिला, पुरुष व आबाल वृध्दांची होत असलेली तारांबळ पाहता महापौर इकबाल यांनी तत्काळ मनुष्यबळ वाढविण्याचे आदेश दिले. या विभागातील सेवक हा क्लार्कच्या टेबलवर काम करताना दिसून आल्यानंतर सेवकाला तेथे बसण्याची संधी कुणी दिली, असे महापौर इकबाल यांनी विचारल्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांना त्याची उत्तरे देता आली नाहीत.
जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील महिला कर्मचाऱ्यासह अन्य एका कामचुकार कर्मचाऱ्याला महापौर सय्यद इकबाल यांनी चांगलेच धारेवर घरले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने प्रारंभी महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरास भेट देऊन स्वच्छता व सुव्यवस्थेच्या सूचना दिल्या. तद्नंतर ते तडक मनपाच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात कुठलीही कल्पना न देता पोहचले. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार त्यांच्या नजरेस येऊन येथील कामे संथगतीने चालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मनपातील कर्मचाऱ्यांनी महापौरांना ओळखल्यानंतर त्यांची भंबेरी उडून कामचुकार व पैशाला लखलेल्या कर्मचाऱ्यांनी महापौरांसमोर तांत्रिक अडचणी व मणुष्यबळाची कमतरता अशी थातूरमातूर उत्तरे देत स्वतःची सुटका करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु महापौर सय्यद इकबाल आपल्या भूमिकेवर ठाम होते. आजतागायत जे झाले ते झाले यापुढे कामचुकारपणा चालणार नाही, अशी स्पष्ट तंबीच महापौर सय्यद इकबाल यांनी संबंधित मनपा कर्मचाऱ्यांना दिली.
मनपात येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान राखा
महापौर सय्यद इकबाल यांनी जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाला भेट दिल्यानंतर येथून मनपा कार्यालयातील आपल्या दालनात जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या काही कामचुकार कर्मचाऱ्यांची बैठक घेत यापुढे हलगर्जीपणा चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला. मनपा कार्यालयातील सुरक्षा रक्षकांना संबोधताना मनपात येणाऱ्या प्रत्येकाचे हसून स्वागत करा, प्रेमाने काम करा, चहापाणी देऊन त्यांची चौकशी करा अशी सूचना महापौर सय्यद इकबाल यांनी दिली. महापौर इकबाल अॅक्शन मोडवर आल्याने मनपातील कामचोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे प्रारंभीस दिसत आहे.