

Illegal Sand Excavation Godavari Manwat
मानवत : तालुक्यातील मौजे वांगी येथील गोदावरी नदीपात्रात लिलावधारकांकडून जेसीबी, पोकलेन आणि यांत्रिक बोटांच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन होत असल्याचा आरोप करत दोन युवकांनी तहसील कार्यालयासमोर सोमवार (ता. २६) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
सचिन रणखांबे आणि मुकेश खरटे अशी उपोषणकर्त्या युवकांची नावे असून त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वांगी (ता. मानवत) येथील वाळू घाटावर १ मार्चपासून अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करण्यात येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
नियमांनुसार वाळू उत्खनन प्रक्रियेत मनुष्यबळाचा वापर अपेक्षित असताना प्रत्यक्षात जेसीबी, टू-टेन पोकलेन आणि यांत्रिक बोटांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. तसेच वाळू वाहतुकीसाठी ट्रॅक्टरऐवजी टिप्पर, हायवा यांसारख्या अवजड वाहनांचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय नदीपात्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था नसल्याने लिलावधारकांकडून सर्रास २५ ते ३० फूट खोलपर्यंत नियमबाह्य उत्खनन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत, सुमारे ११ ते १२ वाजेपर्यंत वाळू उपसा सुरू असल्याचेही उपोषणकर्त्यांनी सांगितले.
गोदावरी नदीपात्रातील उत्खनन हे शासनाने निश्चित केलेल्या क्षेत्रातच ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली करावे. तसेच सध्या सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन तात्काळ बंद करावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.