![शेतात खरीपाची पेरणी करण्यास शेतकरी वर्ग व्यस्त आहे.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2FUntitled-design-T-.-1-177.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
[author title="आनंद ढोणे" image="http://"][/author]
पूर्णा: तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्यामुळे पूर्वी भुईमूग व इतर बागायती पीक असलेल्या ओल्या जमिनीवर खरिपातील सोयाबीन पिकाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. मागील पाच सहा दिवसांपासून भाग बदलत मृग नक्षत्राचा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद पेरणीस सुरुवात केली आहे. तर बहुतांश शेतक-यांनी बेडवरील हळद लागवडीसही सुरूवात केली आहे. कापसाची देखील लागण सुरु आहे. त्यामुळे पेरणी उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अनेक ठिकाणी टोकन पेरणी यंत्र, ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली जात आहे. बैलांच्या मदतीने कमी क्षेत्रात पेरणी होत आहे.
खरीप ज्वारी ५० हेक्टर, मूग ५५० हेक्टर, उडीद १४० हेक्टर, तूर ३५०० हेक्टर, सोयाबीन ३८२००, कापूस ७८५० हेक्टर अंदाजे याप्रमाणे पीक क्षेत्र निहाय खरीप पेरणीचा अंदाज तालुका कृषी विभागाने वर्तविला आहे. यात क्षेत्र कमी अधिकही होऊ शकते.
दरम्यान, मोठा पाऊस पडून जमिनीत भरपूर खोलवर ओल गेल्यावरच खरीप पिकांची पेरणी करावी. अन्यथा, ती करु नये. शिवाय सोयाबीन पिकाची पेरणी ही जिवाणू संवर्धक रायझोबियम, ट्रायकोडर्मा औषधाची बियाण्यास बीज प्रक्रिया करुनच पेरणी करावी. पाऊस कमी असल्यास व जमिनीत ओल भरपूर नसताना पेरणीस घाई करु नये. जमिनीत पेरणी योग्य ओल झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, पंचायत समिती कृषी अधिकारी जी. बी. दहिवडे यांनी केले आहे.
हेही वाचा