

परभणी : तालुक्यातील संबर येथील ओंकार बन्सीधर गायकवाड (वय २२) या तरुणाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करणाऱ्या पाच आरोपींना परभणी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकांनी केली. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भिमा उर्फ भिमाशंकर वैद्य (वय २१, रा. बोबडे टाकळी), वैभव सखेडकर (वय २३, रा. शिराळा), माणिक उर्फ नितीन काळे (सदावर्ते) (वय २२, रा. बोबडे टाकळी), हरीओम मोहीते (वय २२, रा. खानापूर), वेदांत पारवे (वय १९, रा. खानापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
१२ जुलैच्या रात्री ओंकार गायकवाड याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर १३ जुलै रोजी सकाळी सेलू तालुक्यातील मोरेगाव शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी घटनेचे गांभिर्य ओळखत तात्काळ पथक गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे भिमा वैद्य, वैभव सखेडकर, माणिक उर्फ नितीन काळे हरीओम मोहीते, वेदांत पारवे या पाच जणांना सापळा रचून मोठ्या सीताफीने अटक केली.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू मुत्येपोड, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शरद सावंत, सिद्धेश्वर शिवनकर यांनी केली. तसेच, परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत होंगरे, पोलिस उपनिरीक्षक संदीप गडदे, सायबर पथकातील बालाजी रेड्डी, रजवी मुर्तीजा, सम्यद हिना व गणेश कौटकर यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. उसने पैसे का दिले नाही म्हणून अपहरण करून हत्या केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात आला असून चौकशीनंतर नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.