![OBC reservation](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Feed16080-0cbd-4c05-ba39-c5f639d51795%2F87e8ad5f_1749_408d_b2d9_478cfc569668.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जिंतूर : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्यावतीने गुरूवारी (दि.२७) पोहरादेवी ते भगवान गड संवाद यात्रा काढण्यात आली. त्यानिमित्त सुरेश भैय्या नागरे यांच्या जिंतूर -सेलू विधानसभा ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जेसीबीने प्रा. हाके व वाघमारे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सकल ओबीसी समाज एकवटला होता.
यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसी प्रवर्गात असंख्य जाती असून अद्याप सर्व जाती समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत. भविष्यात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. तसेच सोनपेठ येथे बंजारा व पारधी समाजातील नागरिकांना अमानुष मारहाण झाली. त्यातील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा ओबीसी समाजातर्फे जिंतूर तहसील कार्याल्यासमोर तीव्र आंदोलन करणार असे म्हणत प्रा. हाके आणि वाघमारे यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदार जिंतूर यांना दिले. यावेळी सकल ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.