

Employees will go on strike from October 8 due to unpaid salaries for 5 months
परभणी, पुढारी वृत्तसेवा महानगर पालिकेतील कर्मचारी हे पाच महिन्यांपासून पगाराविना हवालदिल झाले आहेत. संतप्त कर्मचाऱ्यांनी दि.८ ऑक्टोबरपासून मनपा कार्यालयासमोर कामबंद धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगर पंचायत संवर्ग अधिकारी-कर्मचारी संघटनेने निवेदन देत शासन व पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
संघटनेने याआधी दि.६ ऑक्टोबरपासून आंदोलनाची घोषणा केली होती, मात्र चर्चा आणि अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे ती तारीख ८ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पगारासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान अपुरे असून, त्यामुळे वेळेवर पगार होत नाहीत. वाढीव अनुदानासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असला तरी तो अद्याप प्रलंबित आहे, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
पगार न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय गरजा या सर्व बाबतीत कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संघटनेने मनपा प्रशासनावरही गंभीर आरोप करत मनमानी कारभार सुरू असून काही कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पदोन्नती देण्यात आली आहे, तर अनेक कर्मचारी २० वर्षांहून अधिक काळ सेवा करूनही पदोन्नतीपासून वंचित आहेत, असे नमूद केले आहे.
निवेदनावर संस्थापक अध्यक्ष के. के. आंधळे, नासेर खान, के. के. भारसाखळे, विशाल उफाडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शासनाने वेळीच लक्ष न दिल्यास महानगर पालिका प्रशासनाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता शासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.